Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ५

Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ५
मुन्नारवर स्वारी: ५ ऑक्टोबर २०००:

ठरल्या प्रमाणे सकाळी साडेआठला न्याहारीसाठी त्याच हॉटेलात थडकलो. ३०-४० मिनिटांची प्रभातफेरी झाली होती. हॉटेलचे बिल मिळाले नव्हते. बिलबाबू नऊ वाजता येणार होता. साडेआठलाच दुपार झाली होती. दिवस उजाडल्याबरोबर दुपार होणे ही कल्पना माझी नाही बरं का. प्र. श्री. नेरूरकर यांची. एका सर्कसबरोबर ते आफ्रिकेच्या दौ-यावर गेले होते. सर्कसबरोबर (माझ्या आठवणीप्रमाणे) ३०-४० दिवस राहिले व प्रवासवर्णन लिहिले. त्यात त्यांनी तसे म्हटले आहे. असो. तर साडेआठच्या टळटळीत दुपारी बाहेर पडलो. उकाड्यामुळे कांही सुचत नव्हते. रंगीत गरम पाणी आजसुद्धा सगळ्यात चविष्ट पदार्थ होता. इडल्या डोसे साधारण होते. सांबार सपक आणि अळणी. गरम असून त्यात रामच काय भरत शत्रुघ्नदेखील देखील नव्हते. दिवसभर खायला मिळणार नाही म्हणून कसेतरी खाऊन घेतले. आमचे खाऊन होता होता तेथे काही स्थानिक लोक खाण्यासाठी आले होते. त्यांच्या पुढ्यात लालभडक सांबार दिसले. त्या हिंदी जाणणार्‍या एकमेव वेटरला ते काय म्हणून विचारले. ते येथील नेहमीचे सांबार आहे. भौत हॉट्ट होता है. आप बंबई के. इत्तना हॉट्ट कैसे खायेंगे? इसलिये आपके लिये ये स्पेशल अल्लग बन्नाया. कपाळावर हात मारायचा बाकी होता. आणखी एका इडली सांबाराची पण त्या नेहमीच्या तिखट, ऑर्डर दिली. फक्त मीठ कमी होते. ते मागविले. बाकी सुरेख होते. मग आणखी मागविली. मीठहि मागवले. आता संध्याकाळपर्यंत तग धरायला हरकत नव्हती. दोघे पेट्रोल भरायला, हवा चेक करायला गेले. तोपर्यंत आम्ही तिघांनी बिल भरून चेक आऊट केले.

अरे नुसते बटाटे घेतले असते तर या हवेत अर्ध्या तासात उकडून मिळाले असते. कोणतरी एक म्हणाला.काढ की तुझ्या डोक्यातले. नको सडलेले असतील. तिसरा. एका वेस्टर्न इंग्रजी सिनेमात (जॉन वेन की काय आठवत नाही) अशा कडक उन्हात दोन माणसे, चरबरीत दाढी वाढलेली त्यांची, एक दुसर्‍याशी पैज लावतो. अंडे फोडून दगडी दगडी फरशीच्या पदपथावर फोडून टाकतो आणि ते शिजते. तो पैज जिंकतो. ते मला आठवले.

जाड्या पैज, अंडे टाकले तर शिजेल. मी. मला सनी साईड डाऊन पाहिजे आहे. आणि ते उलटेपर्यंत तुझ्या कौशल्याने त्याचे स्क्रॅंबल झालेले असेल. त्या हलकट नीच आणि पाजी इसमाने रसभंग केला.
त्यापेक्षा तूच रस्यावर का बसत नाहीस? रोस्टेड पोर्क खायला मिळेल. मी सूड उगवला.
हा शेटजी बघ काही काम करत नाही. अरे अंडी घाल रस्त्यावर निदान काहीतरी चांगले खायला मिळेल. मी.
सध्या खुडुक आहे. शेटजी.

मग कोंबडीच खाऊ. रस्त्यावर भाजेल का रे? नुकताच आलेला मास्तर.
चवदार अन्नाला देखील नाक सॉरी चोच मुरडणारी आहे. कशी चांगली लागेल? जाड्या.
गरम हवेचा त्रास कमी करण्यासाठी असे आचरट संवाद चालू होते.

आता सगळेच आठवत नाहींत.रात्री राहायला चांगले हॉटेल एवढ्या स्वस्तात मिळाले मिळाले ही काय छोटी गोष्ट होती? चलो मुन्नार.

मुन्नार बहाबळेश्वरपेक्षा जास्त उंचावर आहे या कल्पनेने भारून गेलो. तेथे दोन रात्र राहायचे आणि पोटभर खायचे असे ठरले. साडेनऊच्या सुमारास निघालो. सरळ रस्ता असल्यामुळे प्रथम वातानुकूलन सुरू केले. उकाडा थोडा सुसह्य झाला.

उकाड्याची एक गंमत आहे. दिवस उगीचच लांबलचक आणि कंटाळवाणे वाटतात. वेळ घालवण्यासाठी लेफ्ट पो, राईट्ट पो, नेऽऽर पो (नेर = समोर) अशा सूचना सारथ्याला प्रत्येकजण देत होता. केवळ एकमेकांच्या बरोबर होतो आणि आचरट गप्पा चालू होत्या म्हणून सुसह्य झाले. साथीला (रोगाच्या नव्हे) तोंडी लावायला विचित्र केरळी उच्चार होतेच. तोंडी लावायला चांगले असले की पोट भरते. अधूनमधून संगीत होतेच. लता-आशा, बाबूजी, किशोर, रफी खळेसाहेब, नौशाद, मदनजी, रोशन, आर. डी. इ. चे आभार मानले. कोचीनच्या जवळ मुन्नारला जाणारा फाटा फुटतो. वातानुकूलन बंद केले. आता रस्ता विचारायला पाहिजे होता. म्हणून काचा खाली. मुन्नार कोठे कोणालाच ठाऊक नाही. एका केमिस्टच्या दुकानात विचारले. त्यांना अगम्य भाषेची सवय असते आणि इंग्रजीहि येते.

’ओ, यू मीन मुन्णार. हा ’न्णा’ मनोरंजक होता. धड ’न’ नाही व धड ’ण’ पण नाही. मग आम्ही तसा उच्चार करून विचारले तर प्रत्येकाला बरोबर कळले. संस्कृत भाषा की जय. आपलेच उच्चार बरोबर. पण न आणि ण च्या मध्ये एखादे व्यंजन असते तर बरे झाले असते. स्थानिक लोकांचा त्याच प्रदेशातील गावाच्या नावाचा उच्चार कसा चुकीचा असेल? आग लागो त्या फिरंग्यांच्या बोबड्या उच्चारांना. पण त्यांनी आधुनिक विज्ञान आणले म्हणून त्यांना माफ केले. आहे की नाही मी न्यायचतुर रामशास्त्री? अजून एक विषयांतर करून गंमत. माझे मावसे. त्यांना सर्व नाना म्हणत. एक अशिक्षित महिला त्यांना नाणा म्हणते. न म्हटले तर उच्चारता येतो. म्हटले तर नाही. आहे उत्तर?

दुपारपर्यंत मुन्णारचा घाट आला. पाच एक कि. मी. गेल्यावर समोरून एक गाडी आली. म्हणजे तशा येतच होत्या पण ही विशेष होती. दिल्लीचा नंबर होता. भर दुपारी हेडलाईट लावलेले. कॅरिअरवर पिवळे फॉगलाईट पण चालू होते. वा. दिल्लीची पद्धत दिसते. टळटळीत उन्हात फॉगलाईट. दिल्लीकरांची मनसोक्त टिंगल केली. पाचहि जणांचे एकमत. साले मुंबईवर अन्याय करतात काय? मज्जा आली.

जराशाने आणखी एकदोन गाड्या गेल्या. केरळातील नंबर. हेडलाईट चालू. आता मात्र आमची तोंडे पाहाण्यासारखी झाली. पण पाचहि जण मूर्ख होतो म्हणून बरे. तेरीभी चूप, मेरीभी चूपच. एकच असता तर त्याची खैर नव्हती. आणखी पाच एक कि. मी. गेलो. आणि काय. हवेने टोपी फिरवली होती. आणि आमची उडवली. पण वेगळ्या तर्‍हेने. ’गारवा’ मध्ये ऋतू ’कूस’ बदलतो तशी. (’गारवा’ नंतर आली. तेव्हा नव्हती) घनदाट ढग उतरलेले आणि पाऊस. दहापंधरा फुटावरचे पण दिसत नव्हते. आम्ही आता डोंगराच्या विरूद्ध बाजूस आलो होतो. दिल्लीवाल्याने उगीच नाही फॉगलाईट लावले होते. आम्ही ध्यानींमनीं नसतांना अचानक स्वप्नसृष्टीत प्रवेश केला होता. मुन्नारचे पहिलेच दर्शन जोरदार झाले होते. सकाळच्या उकाड्यानंतर त्याचे मोल काय आहे ते सांगून कळणार नाही. वाटले, आताच जून महिना लागलाय आणि पहिल्या पावसातून कॉलेजच्या पहिल्या दिवशी लेक्चरला चाललो आहे असे वाटायला लागले. रुपारेलच्या सुंदर कॅंपसमधील ते रंगीबेरंगी दिवस डोळ्यांसमोर आले.

नंतर ढग वरती गेले पण पाऊस मुसळधार झाला. वेग १५-२० कि.मी. वर आला. रस्ता अगदी खराब. समोरील वाहने अंगावर येताहेत असे वाटत होते. पण एक होते. येथील ड्रायव्हिंग तेल्लीचेरीसारखे ’खास’ नव्हते. तरी आमच्या सारथ्यांच्या कौशल्याला सलाम. मी आयुष्यात असे सारथ्य करू शकणार नाही. रौद्र निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर हवेतील कठीण प्रवासाचा थरार काही वेगळाच असतो. याचसाठी केला होता अट्टाहास. पण हे कौशल्य नसेल तर हा रोमांचकारी थरार क्षणांत मातीमोल होण्याची शक्यता असते.

असो. अखेर दीड एक तासांच्या खडतर प्रवासानंतर मुन्णार आले. सुदैवाने पाऊस कमी झाला होता. हॉटेलशोधन सुरू. मुन्णारचा कोपरा कोपरा धुंडाळला सगळी हॉटेले भरली होती. जगातील सगळे लोक मुन्णारलाच आले होते की काय? एक ’हॉटेल एस एन’ म्हणून आहे. बर्‍यापैकी स्वागत कक्ष. तेथील मॅनेजर कम मालक गृहस्थ छान हिंदी बोलत होते. साठीच्या आतबाहेरील असावेत. पूरा हॉटेल फुल्ल है. दो दिन जगह नही मिलेगी. त्यांनी आमची गाडी रस्त्याने जातांना पाहिली होती.
आपका नंबर बंबईका है?
जी हॉं. मी.
मैं बम्बई मे रहता था. अब्ब रिटायर हुआ. आई ऍम सिक्स्टी फाइव्ह नाऽव. वयाच्या मानाने खरेच तरूण दिसत होते. कितने लोग है? फॅमिली है की सब्ब जेंटस?
सब जेंट्स. पांच.
तो एक काम कर सकता हूं. आप बाकी होटल मे देखो. अगर किधर जग्गा नही मिलती है, तो मै आपको एक रूम दे सकता हूं. एकदम सिंपल है. एकही टॉईलेट है. इंडियन टोईलेट. पेंटिंग बाकी है. लेकिन क्लीन है. अगर आपको पसंत हो, तो.
म्हटले रूम तर पाहू. चाळीतील खोली असावी तशी एकच लांबलचक कळकट अंधारी खोली होती. दरवाजाच्या समोरच्या टोकाला एकच बाथरूम कम इंडियन टॉयलेट होते. उजव्या हाताला पांच कॉट्स रांगेने मांडल्या होत्या. गाद्या अभ्रे मात्र शुभ्र व स्वच्छ होते. बाकी हॉटेले हिंडलो होतोच. पावसाचा जोर पण वाढला होता. परत फिरून पुन्हा खाली उकाड्यात जाण्यापेक्षा हे काय वाईट होते? जाड्याला घासाघीस करायला त्याच्यावर सोडले. सोळाशे सांगितलेल्या रूमचे त्याने ती फार उदास व काळोखी आहे म्हणून किंमत कमी करून पाहिजे करत त्यांना पीळ पीळ पिळून हजार रुपयात पटवली. शेटजींच्या चेहऱ्यावरील हास्य रुंदावले.मस्त थंडगार हवा. आंघोळ करण्याआधी संध्याकाळपर्यंत पावसातच भिजत फिरण्याचे ठरले. शेटजी व मी छत्री घेऊन. शेटजींकडे कंडक्टरची धोपटी होती व माझ्याकडे विकत आणावयाचे सामान येणार होते. जोरदार पाऊस होता. वारा बेताचाच होता म्हणून नशीब. तरी खांदे व रिकामे डोके एवढाच ऐवज पूर्ण भिजला नाही. अर्ध्या पॅंटचे महत्त्व अशा वेळी कळते. पावसामुळे सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेता येत नव्हता. चारपाच फुटावरीलहि काऽऽही दिसत नव्हते. थोडेसे फिरून परतलो. आता माहेला अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी घेऊन ठेवलेली बकार्डी खुणावायला लागली. शेटजींनी एका दुकानात सुरेख दिसतात म्हणून वेफर्स घेतले होते. टॅपिओकाचे वेफर्स. चमकदार असे, दुधाच्या फेसाप्रमाणे पांढर्‍या शुभ्र रंगाचे. एवढे सुंदर दिसणारे वेफर्स आम्ही कोणीहि तोपर्यंत पाहिले नव्हते. पण धोरणीपणा दाखवून आम्ही तसे बोलून दाखविले नाही. निदान चार ग्रेट मेन थॉट अलाईक. थंडीत भिजून हुडहुडी भरल्यावर. त्या कळकट खोलीत बकार्डीला न्याय मिळणार नाही तसेच रूमवर खाद्यपदार्थ आणल्यास घाण होणारच. जसे गाडीत खाऊ नये तसेच रूमवरहि खाऊ नये. म्हणून त्या हिंदी बोलणार्‍या सद्गृहस्थांना जरा ’चांगली’ ’सोय’ करण्यास सांगितले. तेथे त्यांनी एका मोठ्या रूमचे तात्पुरते डायनिंग रूममध्ये परिवर्तन केलेले होतेच. सुरेख सोय केली. कॉर्किंग चार्जेसहि लावले नाहीत. पण एक अविस्मरणीय स्टोरी मिळाली. ते सुरेख आकर्षक दिसणारे वेफर्स. हाय रे दुर्दैवा. चामड्यासारखे चिवट होते. एकच खाईपर्यंत जबडा मोडून जाईल. चामडे, च्युईंग गम आणि बहुधा पोलादाने बनविलेले असावेत. नार्‍याच्या बैलालाऽऽ ............. आम्हाला आता जास्त चवदार खाद्य मिळाले. कायमचे. अजूनहि आम्ही त्याला आंऊ आंऊ करून तोंड वाकडे करून चिडवून दाखवतो व मुन्णारचे वेफर्स एवढेच उच्चारतो. अथातो मुन्नारस्या वेफरकथा. जाड्याची पाण्याची बाटली आणि ते वेफर्स या दोन गोष्टी त्यांना मरेपर्यंत पुरतील. केरळी लोकांना चवीचे एवढे वावडे कां कळत नाही. रात्री पाऊस वाढला. जेवणानंतर फिरण्याची काहीच सोय राहिली नाही. उद्या काय करायचे. दोन रात्री राहण्याचा बेत होता. जर उद्या मुन्णार पाहता आले तर राहू. नाहीतर प्लान बदलू. वाट फुटेल तिथे जायचे आहे. मग त्या उकाड्यातून छोट्या गाडीत पाच जण? चार असतो तर गोष्ट वेगळी. कन्याकुमारी कॅन्सल. कोडाईला जाऊ. दोन रात्री राहू. कारण रस्ता घाटाचा. आणि वाईटच असणार. गाडी चालवतांना फार त्रास होणार. तेथून टेकडी (लिहितात ’थेक्कडी’ असे. केरळ्यांच्या बैलालाऽऽ ...) जरूर पडली तर एखादी रात्र राहू. तेथून कोट्टायम. कोट्टायमपासून बॅकवॉटर्स फक्त १४ कि.मी. आहे. मास्तरांनी माहिती पुरविली. नकाशातहि तसेच दिसत होते. दिवसभर बॅकवॉटर्सला फिरू. संध्याकाळी पुन्हा कोट्टायम. नंतर मुंबईकडे प्रवास सुरू करू. वाटेत एर्नाकुलम. म्हणजे कोचीन. तेथे चायनीज फिशिंग नेट्स पाहू. असेल तर आणखी एखादे ठिकाण. मग परतीचा प्रवास मजल दरमजल करीत पुणे. व देवाची गाडी घेऊन परत मुंबई. ठरले. आम्ही मद्याच्या आहारी जात नाही. इतरांना उपद्रव करीत नाही. स्वत: आनंद लुटतो व थोडे जास्त खिदळतो. बकार्डीला न्याय देता देता हे प्लानिंग केले. असो. नंतर गुढगे टेकण्याचा समारंभ.झोपलो.

०६ऑक्टोबर २०००.
सकाळी साडेपाच सहालाच किचनमधून किणकिणाट ऐकू आला. अहाहा. त्या क्षणी जगात यापेक्षा चांगले संगीत असूच शकत नाही. चहा घेतला. आकाश ढगाळच होते. पण नम्तर मात्र थोड्याच वेळात लख्ख ऊन पडले. उत्साहवर्धक हवा. त्या छान वातावरणातून पाय निघेना. देवाने हॅंडिकॅम काढला. वेड्यासारखा कॅम घेऊन फिरत होता. एका बाजूला ’सरवान’ हॉटेल होते. (सरवान आणि आर्य ही तमिळनाडूमधील सुप्रसिद्ध चेन हॉटेल्स आहेत. हे दोन्ही केरळी नसल्यामुळे दोन्हीतील पदार्थ चवदार व विशिष्ट चांगल्या सातत्यपूर्ण दर्जाचे असतात.) तत्परतेने पोटभर खाऊन घेतले. ’सरवान’मध्ये तीन वेगवेगळ्या चटण्या असतात. हिरव्या मिरचीची कोथिंबीर घातलेली तिखट चटणी, चिंचेची चटणी व आपल्याकडे न मिळणारी टोमॅटोची चटणी. हव्या तेवढ्या. नाहीतरी इडलीला स्वत:ची अशी खास वेगळी जी चव असते ती चटण्यासांबारानेच जास्त खुलते. लवकरात लौकर निघून पर्यायी प्लान अंमलात आणायचे ठरले.

पण या हॉटेल एस एन ने आम्हाला एक रात्र चांगले छप्पर तर दिले. एस एन च्या मालक कम मॅनेजरशेठना चांगल्या सेवेसाठी धन्यवाद दिले त्यांनी नेक्स्ट टाईम इधर हमारे हॉटेलमेही जरूर आना म्हणून धन्यवाद दिले. २००४ साली आम्ही पुन्हा त्याच हॉटेलात उतरलो. आणि त्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. असो. कोडाईकडे कूच केले.

संपूर्ण रस्ता डोंगरातील घाटाचा व वळणावळणांचा. आम्ही मागील प्रवासी मजेत होतो. पण रस्त्याने सारथ्यांची चांगलीच कसोटी पाहिली. एक घाट संपनो न संपतो तोंच दुसरा सुरु. असे वाटायला लागले की या रस्त्याला शेवटच नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत असेच घाटातून वळणे घेत जावे लागणार. एकाबाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. घनदाट वनराई. संपूर्ण निर्मनुष्य. हा टापू तेव्हा भरात असलेल्या वीरप्पनचा होता.

तीन साडेतीन तासांनी एकदाचे एका पठारावर आलो. २५ ३० कि. मी. गेल्यावर एके ठिकाणी रस्त्याच्या समोरच्या कडेला एक टपरी दिसली. चहा घेऊन ताजेतवाने व्हावे म्हणून थांबलो. आता अरण्य संपले होते. पण झाडोरा बर्‍यापैकी होता. असे वाटले की दक्षिण कोंकणातच आहोंत. उतरल्यावर जाणवले की हवा गरम होती. चहा घ्यावा की न घ्यावा या विचारात चारहि जण पडलो. जाड्या सकाळी एकदाच चहा घेतो. मी टपरीवर गेलो. टपरी ही एक झोपडीच होती. आतूनबाहेरून शेणाने सारवलेल्या भिंती. वर झावळ्यांचे व पेंढ्याचे छप्पर. रस्त्याकडे खिडकी होती. डाव्या बाजूने दरवाजा होता. रस्त्याच्या विरूद्ध बाजूला आणखी एक खिडकी होती. तेथे फक्त जेवण मिळत होते. काय काय आहे ते पाहिले. साधा भात, पोंगलभात, सांबार, दोन भाज्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताकाची कढी होती. स्वच्छ चकचकीत स्टीलच्या बादलीत ठेवलेली. एकदम पातळशी कढी, भरपूर कोथिंबीर तरंगत असलेली. फोडणीचा खमंग दरवळ. पदार्थ केळीच्या पानावर वाढले जात होते. टेबले अस्सल ग्रामीण. न रंधवलेल्या ओबडधोबड फळ्या खिळ्याने ठोकून बनविलेली. समोरच्या खिडकी पलीकडे ग्रामीण डस्ट बिन कम वॉश बेसिन होते. लोक त्यांत हातहि धूत होते व खाऊन झाल्यावर स्वत:च केळीचे पान त्यातच नेऊन टाकत होते. फोडणीचा दरवळ मला दूर ठेवू शकला नाही. पण आता तमिळ भाषेशी गांठ होती. मी बोलण्याचा शहाणपणा केला नाही. तेथील विक्रेत्याला स्टीलचा ग्लास दाखवला व ’एक’ या अर्थी तर्जनी एक क्षण उभी धरली आणि लगेच कढीची बादली दाखवली. त्याने लगेच एक ग्लास भरून कढी दिली. करपल्लवी झिंदाबाद. कढीच्या चवीने निराशा केली नाही. थंडगार कढी त्या रणरणत्या उन्हात सुरेखच होती. मला कांहीतरी चांगले सरबत गवसल्याचे बाकीच्यांनी ताडले व सगळे उतरून रस्ता ओलांडून आले. त्यांना वाटले सरबताचा स्टॉल आहे. पण जेवण पाहून त्यांना गंमत वाटली. सगळेजण दोनतीन ग्लास कढी प्यायले. जाड्याने तेवढ्यात प्रवासाला निघाल्यानंतर प्रथमच पाहिलेला पोंगलभात खाऊन पाहिला. आम्ही पण एकेक घास घेऊन चव पाहिली. खरोखरच उत्कृष्ट चव होती.

चवीच्या बाबतीत तमिळनाडु केरळच्या विरूद्ध टोकाला आहे. कोणत्याहि टपरीत जा व इडली, (मेदू)वडा, डोसा वगैरे छान व गरमागरम असते. सांबार व दोनतीन चटण्या भरपूर व हव्या तेवढ्या आणि चविष्ट असतात. ताजेतवाने होऊन निघालो. लगेच पुढला घाट लागला. तीनचारच्या सुमारास कोडाईला पोहोचलो. सुरेखच हवा. किंचित उतरत्या दुपारी पोहोचूनहि घामाचा टिपूसहि नव्हता. २०-२२ च्या आसपास तपमान असावे. हॉटेलात जागा नव्हत्या. जेथे होत्या ती पसंत आली नाहींत. वर फार महाग होती. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे गाईड, हॉटेलांचे एजंट वगैरे त्वरित आपल्या भोवती गोळा होतात. एका एजंटला आम्हाला हॉटेल कसे स्वस्त आणि मस्त तसेच सुरक्षित पार्किंग असलेले पाहिजे ते इंग्रजीतून समजावले. पार शहराच्या टोकाशी असलेले एक हॉटेल त्याने दाखविले. ठीक होते. जरा दूर म्हणजे हिलस्टेशनात असतो त्या मध्यवर्ती बाजारापासून दोनटीन कि. मी. दूर होते. चला. तेवढेच चालणे होईल. पण एकच प्रश्न होता. बाजूलाच मशीद होती. मशिदीला कर्णे होते. हॉटेल डोंगर‍उतारावर होते. आम्ही बेसमेंटमधील खोल्या घेतल्या. खिडक्या दरीत उघडत होत्या. याचे नाव हॉटेल मधुचंद्र असायला हरकत नव्हती. छताला भलेमोठे आरसे होते. पण दर फारच माफक होते. जाड्याने ते रु. ३५०.०० पर्यंत उतरवले. त्याला पदक द्यायला हरकत नाही. चेक इन करतांना आम्ही मराठीतून पण गुप्तभाषेत वाह्यात गोष्टी करत होतो. आणि ते मॅनेजरसाहेब म्हणाले, "अहो साहेब मला मराठी कळते. मी तमिळ मुस्लिम आहे खरा पण मी नांदेडला दहाबारा वर्षे होतो." नंतर दोन दिवस ते आमच्याशी स्वच्छ मराठीतच बोलत होते. आजकाल पर्यटकात मराठी लोक जास्त असतात. म्हणून पर्यटनव्यवसायात इंग्रजी हिंदीखालोखाल मराठी येणाऱ्यांना प्राधान्य मिळते. काय बरे वाटले की नाही ऐकून? यांनी पण चांगली सेवा दिली.

मग सामान उतरवून फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो. येथे रस्त्यावर ठिकठिकाणी उकडलेले शेंगदाणे मिळतात. नुसते उकडलेले, मसालामिश्रित किंवा मसाला व बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घतलेले उकडलेले शेंगदाणे. तसेच निलगिरी तेलाच्या बाटल्या, हाती बनविलेली चॉकलेटे, कॉफी बिया तसेच साऊथ इंडिअन, चिकॉरी मिश्रित वगैरे विविध प्रकारची कॉफी पूड, मी एक आठवण म्हणून निलगिरीची बाटली घेतली. ती अजूनपर्यंत होती. आमचा मुलगा सर्दी झाल्यावर ते रुमालालावून वास घेत असे. ते संपल्यानंतर मात्र त्याने दुसरे आणले नाही. कच्चे व पिकलेले तोतापुरी आंबे होते. कच्चे आंबे कापून मीठमसाला लावून रस्त्यावर मिळतात. ते पाहून शाळेतील दिवसांची आठवण झाली. हे बारा महिने मिळतात म्हणे. दुसरे दिवशी फ़िरायला गाडी व गाईड ठरवला. या वेळी मारूती व्हॅन मिळाली.
क्रमश:

No comments: