Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - १

वाट फुटेल तिथे १

ही कथा आहे एका प्रवासाची. प्रवास आहे दक्षिण भारताचा. ५००० कि.मी. पेक्षा जास्त. पण एका छोट्या मारुती ८०० मधून केलेला. हातात नकाशा घेऊन केलेला एक मनोरंजक, बिनधास्त प्रवास.

आम्ही म्हणजे मी आणि आमचे मित्र. यथावकाश एकेकाचा परिचय होईलच. एकाचे नाव जाड्या. हा या प्रवासात होता. खरे म्हणजे याच्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरी अजून एकत्र येतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे या ओळी याला पाहूनच सुचल्या याबद्दल आम्हाला तिळमात्रहि शंका नाही. अविवाहिततेचे अनंत फायदे पाहा. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफाट. हजरजबाबी तसाच. कोणाची फिरकी केव्हा कशी घेईल याचा कांही नेम नाही. याचे बरेच मोठे गुण आहेत. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. खाण्याबाबतीत बकासूर देखील लाजेल. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फार लोकप्रिय. फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर सौ. गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचा फोन आहे. आमच्यातील एकाचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा एकदा याचा फोन गेला. संक्रांतीचा दिवस होता. १९८२ च्या सुमाराची गोष्ट. "पुरणपोळ्या केल्या की नाहीत? खायला येतो." ती बावचळून म्हणाली "आता कुठे? होळीला करतात." हे महाशय म्हणाले "होळीच्या दिवशी तर किशोर म्हणाला की संक्रांतीला करतात." बिचारा किशोर होळीच्या दिवशी जाड्याच्या ऑफिसात पुरणपोळ्यांचा डबा घेऊन हजर. तर असे हे आमचे मित्ररत्न. पार्ट्या व पिकनिक्स याचे हवन याच पठ्ठ्याने अविरत चालू ठेवले. वर्षाला दोनपांच पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. १९९७ पासून वर्षाला पाचसहा पिकनिक्स असतात. हल्ली फोनाफोनीमुळे व मेलामेलीमुळे तसेच चॅटमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गप्पा होतात. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या तीन सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे आजूनहि वाटते एवढ्या ताज्या आहेत. लिप्टन चहाएवढ्या. त्यापैकी पहिल्या सहलीच्या या आठवणी.

मुले मोठी झाली तसे आम्ही कौटुंबिक जबाबदारीतून थोडेफार मोकळे झालो. आमचे पुत्ररत्न पण १० वीत गेले. क्लासमुळे तो अभ्यासात पण अधिक स्वयंपूर्ण झाला. (शेवटी माझ्याच वळणावर गेला) सौ चा वेळ त्याच्या उस्तवारीत जाऊ लागला. ती गृहस्वामिनी आहे. अर्थात नोकरी करीत नाही. मी जास्तच मोकळा झालो. इतरांची मुले १ वा २ वर्षे पुढेमागे. साहाजिकच आम्हाला दूरच्या प्रवासाची स्वप्ने पडू लागली. तसे आम्ही काही अगोदर ठरविले नवह्ते म्हणा. पण म्हणतात ना ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. आणि आम्ही स्वत:ला विद्वान (असलो तरी) समजत नाही. शेवडे व देवा म्हणजे देवगांवकर यांनी ठरविले की दूरच्या प्रवासाला मारुती ८०० घेऊन जायचे. आणखी कोण येवो अथवा न येवो. दोघेच तरी जाऊ. जाड्या हे आमचे मध्यवर्ती दळणवळण केंद्र आहे. जाड्या तिसरा बहुतेक येईल. आलाच तर कालू. म्हणजे अस्मादिक. तुम्हाला म्हणून सांगतो, हे सगळे माझ्या रंगावर जळतात. कुठे जायचे? प्रथम सर्वजण रजा टाकू. नकाशा घेऊन वाट फ़ुटेल तिथेल जाऊ. रजा सलामत तो स्थळे पचास. गणेशोत्सव चालू होता. आत एकेकाच्या रजेच्या तारखांची जुळ्वाजुळव. देवाची मारुती ८०० घेऊन पुण्याला जायचे. शेवडेच्या मारुती ८०० मध्ये बसायचे व निघायचे. वाट फ़ुटेल तिथे. अरे हो. सांगायचे राहून गेले. या दोघांचेहि ड्रायव्हिंग उत्कृष्ट. सुरक्षित आणि गाडीचे वजन, रस्ता पकडण्याची कुवत व रस्त्याची स्थिति या गोष्टींना अनुसरून योग्य त्या वेगात. नाहीतर स्वर्गातच जावे लागायचे. अर्थात आम्ही पुण्यवंत असल्यामुळे. आमचा चिन्या जोशी नावाचा एक मित्र आहे. याचा रंग माझ्यासारखा. म्हणून याला आम्ही किरवंत म्हणतो. हा देखील जगी सर्वसुखी अर्थात अविवाहित आहे. "फक्त मुलांच्या" शाळेत वाढल्यामुळे वाह्यात विचार येतात. विषयांतराबद्दल क्षमस्व. असो. तर द्वारकाधीश कृष्ण वा मद्रनरेश शल्याला लाजविणारे दोन थोर सारथी आम्हा भाग्यवंतांच्या समवेत होते आणि अजून आहेत. अखेर १ ऑक्टोबर २००० ही तारीख ठरली. नवरात्राचा पहिला दिवस. सरत्या पावसाची मजा कांही औरच. रजा टाकल्या. भरपूर अवकाश असल्यामुळे रजा मान्य न होण्याचा प्रश्न नव्हता. कुठे जायचे? दक्षिणेलाच जाऊ. मी शाकाहारी. शेवडे व देवा ब्राह्मण म्हणजे शाकाहारातच जन्म काढलेले. इडल्या डोसे मिळ्तील. खाण्याची आबाळ होणार नाही. मला नाहींतरी काळ्या वर्णाचे आकर्षण आहेच इति इतर. जाड्या जरी अट्टल मांसाहारी किंबहुना मांसाहाराच्या व्यसनांत अडकलेला असला तरी तो कांहीहि आणि कितीहि खाऊ शकतो. त्याने आयुष्यात एकदाच खाण्याचा पदार्थ टाकला आहे. बॅंकॉकच्या हॉटेलातील मगरीचे सूप. पण ते मगरीचे आहे हे ठाऊक असून त्याने ते मागविले. काय हे धारिष्ट्य? तर ठरले. चलो दक्षिण भारत. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन ..... निघण्याआधी एक आठवडा तिघा मुंबईकरांची बैठक झाली. सोबत नाही म्हणत असणारा चौथा मुम्बईकर नार्‍या ऊर्फ नारकर असे. फोनाफोनी चालूच होती. शेवडेमास्तर (पुण्याचे असल्यामुळे) फोनवर होतेच. हा सद्गृहस्थ प्राचीन काळी मिलमध्ये वस्त्र अभिअयंता होता. तेथे याला मास्तर म्हणत. म्हणून हा मास्तर. रुट ठरला. पुणे कोयना मार्गे राष्ट्रीय महामार्ग १७ म्हणजे मुंबई गोवा रस्ता पकडायचा या रस्त्याने गोवा मुर्डेश्वर-मडिकेरी तेथून केरळात उतरायचे. रा म मा १७ ने तेल्लीचेरी-माहे-कोझीकोडे- एर्नाकुलम-अलेप्पी मार्गे कन्याकुमारी. रस्त्याचा नकाशा नकाशा घेऊन जायचे. रा म मा १७च कां? कारण या रस्त्याला रहदारी कमी असते म्हणून ड्रायव्हिंग सोपे जाते फक्त दिवसा चांगल्या उजेडातच सारथ्य करावयाचे. ऊगीच किरवंताला काम नको. सालेमकडून येणार्‍या सालेम कन्याकुमारी रा म मा ४७ ईडपल्ली येथे रा म मा १७ ला मिळतो. त्यामुळे रस्त्याच्या ईडपल्लीपुढील भागाला रा म मा ४७ म्हणतात. त्याने पुढे कन्याकुमारीला जाऊन मग मागे वळायचे असा बेत ठरला. येतांनाचा मार्ग येतांनाच ठरवू. फक्त फ्लेक्सिबल सामान घ्यावयाचे. कमीत कमी सामान ही सुखाच्या प्रवासाची गुरुकिल्ली आहेच. दोनचार हाफपॅंटी व दोनचार टी शर्ट, पुरेशी साताठ अंतर्वस्त्रे, दाढीचे सामान, माफक औषधे - ऍस्पिरीन, पॅरासीटमॉल, लोमोटील, जेल्युसील वगैरे गोळ्या, टोपी, छत्री, बटरी, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, दोरीसाठी इंग्रजी एस आकाराचे पोलादी हूक, चाकू, बस्स. सुदैवाने पन्नाशी ओलांडली तरी आमच्यापैकी कुणालाच अजून कोणत्याहि गोळ्यांची अद्याप लागण झालेली नाही. ही तर ७ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असो. मारुती ८०० मधे पावसामुळे कॅरिअर नसतांना चारपाच बॅगांखेरीज आणखी काय राहणार? गंमत म्हणजे पाचवा नार्‍या बरेच आढेवेढे घेतल्यानंतर तयार झाला. तसे आम्ही त्याच्या मागे होतोच. एकंदरीत आमचा उत्साह व नकाशा घेऊन जाण्यातील थरार त्याला दूर ठेऊ शकला नाही. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. दर बैठकीला तो हजर असेच पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने होकार भरला नव्हता. मारुती ८०० मध्ये पाचवा म्हणजे अतीच. परंतु खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याची अडचण वा गर्दी जाणवणार नव्ह्ती फक्त त्याची बॅग मागील कांचेवर येणार होती. मुख्य म्हणजे आमच्या सारथ्यांना हे मान्य होते. नार्‍याचा एक गुण आहे. नार्‍या हिशेब चोख ठेवतो. प्रत्येकाकडून व्यवस्थित पैसे जमा करतो मोत्यासारख्या अक्षरांत हिशेब लिहितो झोपण्यापूर्वी प्रत्येकाला काही खर्च केला की काय हे विचारतो व असल्यास त्वरित पूलमधून देऊन टाकतो. थोडक्यात म्हणजे तो चांगला रोखपाल म्हणाजे कॅशिअर आहे. या वेळी त्याने पूलचे पैसे ठेवायला बस कंडक्टरसारखी बॅग आणली होती. लेजरच्या आकाराची उभी व नारिंगी रंगाची चामड्याची. ती तो या सहलीत प्रत्येक ठिकाणी आणत असे. सकाळी तो रूमवरून निघतांना ती जी खांद्याला लटकवायचा ती संध्याकाळी रूमवरच उतरवायचा.

पाचहि जण उत्कंठेने व उत्साहाने भारून गेलो होतो काय करू आणि काय नको असे झाले होते. फोनाफोनीला वेग आला होत. केव्हा एकदा १ तारीख उजाडते असे झाले होते. माझ्या कल्पनेचा वारु उधळायला नेहमीप्रमाणे दशदिशा मोकळ्या होत्याच. सगळे जग नेहमीपेक्षा सुंदर आणि भव्य वाटायला लागले होते. आम्ही सगळ्यांनी पुन्हा वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण केले.

१ ऑक्टोबर २०००
अखेर १ तारीख उजाडली. जाड्याची एक गंमत आहे. त्याला अजिबात दिशाज्ञान नाही. त्याच्या स्वत:च्या घरासमोर त्याला स्वत:भोवती गरगर फ़िरवून सोडले तरी त्याला स्वत:चे घर दाखवता येईल की नाही याबद्दल शंकाच आहे. तरी त्याला घेऊन योग्य ठिकाणी ऊभे राहण्याची जबाबदारी माझी. केवढा जबाबदार माणूस मी! कालू दा जबाब नही . तर याला घेऊन मी कलानगरच्या नाक्यावर उभा राहिलो. देवा बांगूर नगरवरून निघाला. त्याने सांताक्रूझ सबवेसमोर हायवेला नार्‍याला घेतले व आम्हाला कलानगरला घेतले आणि आम्ही पुण्याकडे कूच केले. आम्हा सर्वांचा एक साधा पण चांगला गुण म्हणजे वक्तशीरपणा. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बरोबर सात ऐवजी पावणेसातला कलानगरवरून निघालो. वेळ न पाळणारांना आम्ही कटवले हो सूज्ञांच्या लक्षांत आले असेलच. रहदारीची गर्दी होण्यापूर्वी निघाल्यामुळे योग्य त्या वेगाने जाऊन पुण्याला मास्तरांच्या घराखाली ठरल्याप्रमाणे बरोबर साडेदहाला पोहोचलो. तेव्हा दृतगती मार्ग अर्धाच झाला होता. परंतु जयंतराव टिळकांना त्याबद्दल सलाम केला. भ्रमण्ध्वनीवरून फोनाफोनी चालू होतीच. जाड्याच्या रसनेवर सरस्वती नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहाने नृत्य करीत होती. पुणे कधी आले कळले देखील नाही. आदल्या दिवशीच मास्तरांनी गाडी सर्व्हिस करून घेऊन पेट्रोल भरून हवापाणी आणि ऑईल ठीक करून तयार ठेवली होतीच. ताबडतोब या गाडीतून सामान त्या गाडीत टाकले व पाच मिनिटात निघालो. सौ. मास्तरांचे न्याहारीचे आमंत्रण साभार टाळले. कठोर निग्रह बरें. खरे म्हणजे आमचे जिभेवर नियंत्रण नाही म्हणून ती टिंगल करेल हीच भीती जास्त होती. पण पहिले म्हणजे आमच्या वेळापत्रकाचे बारा वाजले असते. आणि दुसरे म्हणजे खाणेपिणे टाळता येण्याएवढा निग्रह आमच्याकडे नसल्याबद्दल सौ मास्तर किंवा मास्तरीणबाईंनी आमची भरपूर टिंगल केली असती. देवाची पदावनति होऊन किलींडरच्या जागेवर आणि मी सर्वांत बारीक असल्यामुळे मागे डावीकडे जाड्या व उजवीकडे नार्‍या या दोघांच्या मध्ये अशी पदावनति झाली.

सातारा रस्त्यावरून उजवे वळण घेतले आणि रहदारी कमी झाली. दूर आल्यासारखे वाटायला लागले आम्ही आमच्या डोमेनमध्ये... अपेक्षित दुनियेत येऊन पोहोचलो असे वाटायला लागले. थोडेसे ढगाळलेलेच होते. रस्ता खराब असल्यामुळे सारथ्याची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून वटवट कमी करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होतो. वेग २० - २५ वर आला. घाई कुणाला होती. आमची घाई सकाळी निघेपर्यंत. नंतर प्रवासाचा आस्वाद घेणे. दीडदोन तासांनी सारथ्याला विश्रांति देण्यासाठी ब्रेक घ्यायचा. ड्रायव्हर व किलींडर यांची अदलाबदल करायची. ताजेतवाने व्हायचे. झालेच तर एखादा चहा व पुन्हा पुढे निघायचे. पहिलाच दिवस असल्यामुळे उत्साह ओसंडून वहात होता. हास्यविनोदाला उधाण आले होते. रा म मा १७ आल्यावरच जाड्याला परमेश्वराचा पहिला अवतार मिळण्याची शक्यता. पुढे किती दिवस त्याला सांबार खावे लागणार कोण जाणे. म्हणून तेव्हाच जेवण असे ठरले. अडीच वाजून गेले तरी रा म मा १७ दिसेना. जाड्या भुकेने कासावीस. अजून एक कोड ऑफ़ कॉन्डक्ट असा की गाडीत कहीहि खायचे नाही अन्यथा झुरळे मुंग्यादि कीटकांना आमंत्रण. ड्रायव्हर बदलतांना जाड्याकडील सर्व मारी बिस्किटांचा स्टॉक संपला. अर्थात आम्ही इतर चौघांनी देखील बिस्किटांचा अवमान केला नाही. त्याचे भुकेने कासावीस होणे पाहून आमची भरपूर करमणूक झाली व आम्हा इतर चौघांना भुकेची तीव्रता जाणवली नाही. परंतु रा म मा १७ आल्यावरच जेवायचे यावर तोहि ठाम होता. मासे मिळण्याचे आमिषहि त्याला होतेच. आम्ही देखील त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होतो. आम्ही ४ मुंबईकरांनी न्याहरी देखील केली नव्हती. शेवटी शेवटी हॉटेल दिसले की तो थांबायचा आग्रह करी. नंतर आग्रहाचे रूपांतर हट्टात झाले. त्यामुळे फक्त टिंगलीचे प्रमाण वाढले. हे दोघे गाडी अशा ठिकणी थांबवीत की आजूबाजूला हॉटेल नसे. सौ शेवडे ही देवाची सख्खी बहीण. नेमक्या अशा टिंगलीच्या क्षणी तिचा फोन आला. सुकाणू देवाकडे होते. मास्तरचे बोलून झाल्यावर त्याने जाड्याकडे फोन दिला. आम्ही सकाळी उठल्यापासून काहीहि खाल्लेले नाही व तुझा रथचक्रधारी क्रूरकर्मा भाऊराया आम्हाला काहीहि खाऊं देत नाही अशी त्याने तक्रार केली. तेव्हा तिनेहि मग तुमच्या मैत्रीत काही दम नाही बघ असे बोलून त्याची फिरकी घेतली. केवळ वजन वाढून त्याची प्रकृति बिघडूं नये हा एकमेव उदात्त हेतु त्यामागे आहे अशी आम्ही फोनवरून ऐकू जाईल असे ओरडून साक्ष देण्याचे परम कर्तव्य बजावले. त्यामुळे तिचीहि करमणूक झाली. अर्थात नंतर देवाच्या घरच्यांची देखील झाली असणार.

कमी वेगामुळे रा म मा १७ येईपर्यंत साडेतीन वाजून गेले. आमचा अगोदर अंदाज होता की संध्याकाळी पाचसहापर्यंत कणकवलीला पोहोचू. परंतु उजेड फारच कमी होता. संध्याकाळचे सात वाजल्यासारखे वाटावे एवढा अंधार तीनसाडेतीनलाच होता. त्यातच फारच जोरदार पाऊस. वळणे आहेतच. रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. तशात पावसाचा जोर वाढला. वायपर चालू होते. वेग आणखी कमी. सगळ्यांचे लक्ष रस्त्याकडे लागलेले होते. ड्रायव्हर किलींडर समोर, मी मागे मध्यभागी. जाड्या डावी व नार्‍या उजवी बाजू अशी वाटणी झाली. चारसाडेचारला हातखंबा आले. परंतु थोडे आंत जाऊन रत्नागिरीला मुक्काम करावा असे ठरवले. हायवेला हॉटेलाचे दर चढे असणार व सेवा देखील चांगली नसणार. रत्नागिरीलाच मुक्काम केला. हॉटेल पसंत करणे माझ्याकडे व घासाघीस करणे जाड्याकडे आले. घासाघीस करायला बायको नसल्यामुळे तो स्वत:च उत्तम घासाघीस करतो जे विवाहितांना करावे लागत नाही. मासळीबाजारात कोळणी त्याला गंडवतात तो भाग वेगळा. एका डबल ऑक्युपन्सीमध्ये मास्तर व देवा म्हणजे ब्राह्मण आणि दुसरीत आम्ही तिघे म्हणजे ब्राह्मणेतर अशी जातीय विभागणी झाली. नार्‍या वगळता आम्हा चौघांचा देवाधर्मावर विश्वास नसल्यामुळे आणि संकटप्रसंगीदेखील आम्ही अविचल रहिल्यामुळे आम्ही सर्व धर्मांची यथेच्छ टिंगल करतो. जातपात देखील मानत नसल्यामुळे आम्ही खाजगीत एकमेकांची जातीय टवाळी करतो. अर्थात इतरांच्या भावना दुखावू नये म्हणून खाजगीत. रात्री आठनऊ पर्यंत पाऊस पडत होता. दुसर्‍या दिवशी लवकर उठून जाण्याची खुमखुमी असल्यामुळे जेऊन लगेच झोपलो मास्तर व मी रोज साडेनऊलाच झोपतो. जेवल्यावर आम्ही दोघे झोपलो. नार्‍याने दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाला बिल व न्याहरी मिळेल याची व्यवस्था केली. देवाने गाडीची पाहाणी केली. जाड्या वजन आटोक्यात ठेवण्यासाथी जेवण्यापूर्वी भरपूर व्यायाम करतो व जेवणानंतर भरपूर चालतो. पाऊस नंतर थांबल्यामुळे त्याच्या चालण्यात व्यत्यय आला नाही.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav.com 11 Feb. 2008

No comments: