Monday 30 June 2008

वाट फुटेल तिथे - ९

पुट्टू

१०-१०-२००० इडप्पल
मुंबईपेक्षां गरम हवा इ. एवंगुणविशिष्ट इडप्पल गांवाचे वर्णन भाग क्र. ४ मध्ये आलेले आहे त्यामुळे द्विरुक्ती करीत नाही. त्या नीरस गावात पुन्हा काय पाहायचे म्हणून फारशा अपेक्षा न ठेवता संध्याकाळी एक आंघोळ टाकून फेरफटका मारला. तरी वेफर्सचे दुकान दिसल्यावर नार्‍याची भरपूर खेचली. पूर्वी खाल्लेल्या उपाहारगृहातच पोटोबा केला. तो गरगरीत मालक आम्ही पुन्हा आलेले पाहून खूष. सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले. या वेळी मात्र गरमागरम तिखट सांबार आणि भाताचा समाचार घेतला. सोबत थंड चपात्या आणि अवियल होते.

दुसरे दिवशीं सकाळी सातला शुचिर्भूत झालों आणि गाडीत पेट्रोल, हवा वगैरे भरून तयार झालो. बिल मिळताच निघालो. रस्त्यात कोठेतरी खायचे ठरले. कुठल्या हॉटेलात जायचे ते सांग असे देवाने सांगितले. तासादीडतासाने जाड्याला भूक लागली. देवा चाकावर, गाडी सुसाट. जाड्यानें हॉटेल दाखवले की हा हळूच वेग वाढवी. हॉटेल पट्कन मागे जाई. तू हॉटेल दिसले की लगेच दाखवत नाहीस, मागे गेल्यावर दाखवतोस असा देवाने आरोप केला. अर्थातच आम्ही इतरांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचे भुकेनें कासावीस होणे पाहून आमची करमणूक. मग हॉटेल दाखवले की दुसरा कोणीतरी हे नको, फालतू आहे पुढचे पाहूं म्हणे मग हा त्याच्यावर रागवे आणि वाद घाले. इतर आणखी चेकाळत. अर्धाएक तास असे त्याला पिडल्यावर कन्नोरच्या आसपास कुठेतरी वळणामुळे वेग कमी झाल्यावर एका हॉटेलाबाहेर पार्किंगला बर्‍यापैकी जागा दिसली म्हणून थांबलो.

हॉटेल धड स्वच्छ नाहीं तर धड कळकटहि नाही. हॉटेलात फक्त आम्हीच. ताबडतोब पाचसहा वेटर्सनी आम्हांला वेढले. इडली नाही, सांबार नाही, चटणी नाही, अप्पम नाही, इडीअप्पम नाही, फक्त पुट्टू, कसलासा रस्सा आणि ऑम्लेट वगळून इतर मांसाहारी पदार्थ. म्हणजे चिकन रस्सा आणि मटन रस्सा. पुट्टू म्हणजे काय हे खाणाखुणा करून विचारले. उभ्या ग्लासासारखा ग्लासाएवढाच एक पांढरा दंडगोल दाखवला. कणीपेक्षा किंचित बारीक पण रव्यापेक्षां किचित जाड कणांचा बनलेला. एक खाऊन बघू म्हणून एकाने पुट्टू आण म्हणताच प्रत्येका समोर पुट्टू आणून आदळला. देवाने, जाड्याने आणि शेवडेने त्वरित परत पाठवला. दोन पुट्टू पाचजण सहज उडवू, आवडला तर पुन्हा मागवता येईल या अपेक्षेने मी आणि नार्‍याने राहूं दिला. वातड मटणासारखा टणक आणि चिवट, त्यातून थंडगार, कसलीहि चव नाही. संगमरवर भिजवून शिजवून मऊ करून आणले होते बहुधा. बरोबर चटणी वा सांबारासारखे काहीहि नाही. चमत्कारिक चवीचा बिनतिखट रस्सा. तोहि थंडगार. आम्ही दोन घास घाल्ल्यावर तिसरा खाऊ शकलो नाही. देवा शेवडे तर एका घासावर थांबले. जाड्याने चिकन मसाला आणि पाव मागवला. त्याच्या प्लेटमध्ये थंड रश्शात प्रचंड आकाराचा कोंबडीचा पाय होता. गिधाड खातोस म्हणून आम्ही त्याला भरपूर चिडवले. पण त्यानें आमच्याकडे दुर्लक्ष करून नेटाने ते संपवले. नार्‍याने पावाच्या छोट्या तुकड्याबरोबर चव घेऊन पाहिली आणि फालतू घाण काहीतरी मागवतो म्हणून जाड्याच्या बेचाळीस पिढ्यांचा यथेच्छ उद्धार केला. त्याला पाण्याच्या बाटलीचे चौदा रुपये अजिबात देऊ नकोस म्हणून मास्तराने आगीत तेल ओतायचें पवित्र कार्य केलें. जेवणांतून विषबाधा होऊन सोळा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू अशी ठळक बातमीहि मी प्रदीप भिडेच्या आवाजात काल्पनिक दूरदर्शनवर वाचली. मध्येच मी घूऽऽऽ कुच कुच कुच कुच असा आवाजहि काढला. कसला आवाज म्हणून कोणीतरी विचारले. जाड्याच्या पोटातून गिधाड ओरडले म्हणून मी जाहीर केले. गिधाड कसे ओरडते हे कोणाला ठाऊक होते? पण त्या गंमतीजंमती मुळे फारच मजा आली. अन्यथा न्याहारीचे तीनतेरा वाजलेच होते. अजूनहि आम्ही कधी कधी एकमेकांना पुट्टू खायला घालीन अशी धमकी देतो. रात्रीं बैकमपाडीला ‘हॉटेल बालाजी’ मध्ये थांबून यथेच्छ भोजन करायचे असे ताबडतोब ठरले.

कासारगोडच्या आसपास कुठेंतरी एक टायर पंक्चर झाला. मेस्त्री चला, कामाला लागा म्हटल्यावर मी लगेच कामाला लागलो. हातोडी, पान्हे वगैरे चालवण्यात आमच्यात मी किंचित कमी डावा. उजवा नक्कीच म्हणता येणार नाही. जरी डावखुरा नसलो तरी. दहा मिनिटात टायर बदलून निघालो. वाटेंत पंक्चरदेखील काढले आणि ठरल्याप्रमाणे चारसाडेचारच्या सुमाराला बैकमपाडीला पोहोचलो. दोन दिवसांचे कपडे धुतले आणि मस्त झोप काढली. चित्रवाणीवर आय सी सी नॉक आऊट क्रिकेट मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान चालू होती. ती पाहिली. झहीरखानची सुंदर गोलंदाजी पाहिली. कपिल देव, श्रीनाथनंतर भारताला चांगला वेगवान गोलंदाज मिळाला आणि आपण जिंकलो देखील या आनंदात जेवण जास्त स्वादिष्ट लागले. पोटोबा झाल्यावर शतपावली करून झोंपलो. दुसर्‍या दिवशी सातलाच निघायचे होते तरच संध्याकाळपर्यंत गोव्याला पोहोचणार. परवा तसेच सकाळी गोव्याहून निघून संध्याकाळी पुणे गाठायचा विचार होता.



वाट फुटेल तिथे - ८

कोट्टायम आणि एर्नाकुलम

कोट्टायम ०८-१०-२०००.
नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

मस्त थंड पाण्याचा शॉवर घेऊन फिरायला बाहेर पडलो. कोट्टायम शहर स्वच्छ आहे. कोठेहि पानाचे ठेले नाहीत, प्रशस्त नसले तरी साधारण रूंदीचे डांबरी गुळगुळीत रस्ते, चांगले चारपाच कि.मी. पायी फिरलो. कोठे खणलेले नाही, कचरा कोठे दिसला नाही, दुकाने सुबक, स्वच्छ आणि आकर्षक. मालाने खचाखच भरलेली व समृद्ध. खाण्याची हॉटेले पण शेट्टी लोकांच्या हॉटेलासारखी स्वच्छ. इथेहि इडप्पलसारखेच थंड खाणे इतर टेबलावर लोकांच्या पुढ्यात दिसत होते. तशीच दोन प्रकारची हॉटेले. शाकाहारी व मांसाहारी. तसेच दर. मांसाहारी हॉटेलांत - बहुधा ख्रिस्ती बंधूंची असावीत - स्वस्त दरातले बीफ उपलब्ध. मग इतर ठिकाणी खाण्यापेक्षा डायनिंग हॉलमध्ये खायचे ठरवले. निदान त्या शेफला तरी चवीतले थोडेफार कळत असेल. दालफ्राय, तंदुरी रोटी, छोले, जिरा राईस झकास. मुख्य म्हणजे गरमागरम. उर्दूवाचनहि स्वस्त नाही तरी बरे होते. पाच जणांनी पोटभर खाऊन पाचशेसाडेपाचशे रु. झाले. जेवल्यावर शतपावलीखातर थोडे फिरून परत आलो. साडेसहाला चहा आणि बिल मिळेल म्हणाले. आम्हांला तरी यापेक्षां जास्त काय हवे होते?

कोट्टायम दि. ०९-१०-२०००

आता परतीचे वेध लागले होते. मोरपीस अलगद पुस्तकाच्या पानांत ठेवावे तशा मधुर आठवणी आठवणीच्या कप्प्यात ठेवत होतो. खेळण्याच्या दुकानात लहान मूल जावे आणि हे घेऊ कीं ते घेऊ असा त्याला प्रश्न पडावा असे आम्हाला सगळ्यांना झाले होते. मडिकेरी जास्त छान की कोडाई? प्रत्येक ठिकाण वेगळे आणि अतुलनीय. प्रत्येक ठिकाणचा स्मृतिगंध वेगळा आणि हवाहवासा वाटणारा. मनस्थिति इतकी उत्कट होती की न्याहारी केली की नाही हे देखील आता आठवत नाही.

आता परतीच्या वाटेवरले कोचीन/एर्नाकुलम तेवढे पाहायचे होते. हायवेने रस्ता कापीत होतो. तीच ऊष्ण व दमट हवा. तीच केरळ स्पेशल रहदारी. तेच मागून वाजणारे बसचे कर्कश भोंगे, आपल्या पुढे जाऊन त्या अवजड बसेस तश्शाच करकचून ब्रेक दाबून थांबत होत्या. पण त्या उत्फुल्ल मनस्थितीत काहीच खुपेनासे झाले. प्रसन्न आठवणी मनांत रुंजी घालत होत्या. मागचे तिघेहि अंतर्मुख. बोलणे जवळजवळ नाहीच. ड्रायव्हर किलींडरच काय ते बोलत होते. म्हणजे ड्रायव्हर विचारत होता व किलींडर उत्तर देत होता. त्रिचूर किती कि.मी.? कोचीन किती? वगैरे वगैरे.

माध्यान्हीच्या सुमाराला कोचीन आले. किती वाजले होते आता लक्षात नाही. पण कडक ऊन आणि प्रचंड गरम हवा ४० अंश सेल्शिअस अंदाजे. तपमापक अर्थातच आपली त्वचा आणि तिला जोडलेला मेंदू. चायनीज फिशिंग नेट्स पाहिली. तिथे आपल्यासमोर मासे पकडून किनार्‍यावर ठेवलेल्या कोळशाच्या शेगडीवर आपल्यासमोरच भाजून (सपाट तव्यावर तेलात भाजणे = शॅलो फ्राय) देतात. जाड्याच्या मत्स्यप्रेमाला पान्हा फुटला नसता तरच नवल. छान आहे म्हणून खाल्ला. मास्तरांनीं फक्त चव पाहिली. नार्‍याने तेहि धैर्य केले नाही. मनासारखा प्रवास घडल्यानें सगळे तृप्त होतों. हवाहि गरम होती. इतर कोणी खायच्या मूडमध्यें नव्हतेच. आता तिथले प्राचीन सिनेगॉग पाहायचे होते.

सिनेगॉगमध्यें पाऊल टाकले आणि एकदम स्थळकाळाच्या सीमा ओलांडल्या. कुठेतरी मध्यपूर्वेत अरबस्तानांत सीरीया, ईजिप्त वगैरे देश चित्रवाणीवर पाहिले होते तिथे पोहोचलो. शेदोनशे वर्षापूर्वींच्या काळात गेलो. एका रखरखीत बोळात वसलेले ते सिनेगॉग. आजूबाजूला एकहि झाड नाहीं. वर तळपते ऊन. रस्याकडेला उघडे नाले. रस्त्याकडेच्या खांबावर उघड्या तारा. टेलिफोनच्या आणि विजेच्या पण. जुन्या वाड्यात असते तसे दगडी फरशी बसवलेले आवार. आवाराला तिन्ही बाजूंना भिंत. मागची बाजू पाहिली नाही. भिंतीतच बसवलेला लाकडी दरवाजा. बोळ जसा किरकोळ तशी वाडासदृश इमारतहि किरकोळ, फाटकहि किरकोळच. भव्यतेचा मागमूस नाही. पनवेल, पुणे, वाई, इथले वाडे होते तशी इमारत. फाटकापसून अदमासे दहापंधरा फुटांवर मुख्य इमारत. आवारात झाडेझुडुपे होती की नाही आता आठवत नाही. फोटो काढावेसे वाटले नाहीतच. धर्मासंबंधी असल्यामुळें असेल. स्थापना इ.स. १५६८ - कोरलेलें होते. आम्हाला वाटले होते शेदोनशे वर्षे मागे गेलो. हे तर चांगले चारशे साडेचारशे वर्षे जुने होते.

आत गेल्यावर माहीमच्या ‘श्री’ सिनेमात वा गिरगावजवळच्या ऑपेरा हाऊसमध्यें गेल्यासारखे वाटले. (टंकता टंकता आठवण झाली, या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रपटांच्या तिकिटचे दर उलट होते. म्हणजे पुढचे तिकीट महाग आणि दूरचे व बाल्कनीचे स्वस्त. नाटकाच्या थिएटरची परंपरा म्हणून.) परंतु स्थापत्य पूर्णपणे वेगळे आणि अपरिचित. आपल्याला हेमाडपंती मंदिरे, दाक्षिणात्य स्थापत्याची देवालये, रोमन आणि गॉथिक शैलीतील इमारती, चर्चेस पाहायची सवय आहे. ही स्थापत्यशैली पूर्णपणें अपरिचित. आकर्षक नाहीच. स्थापत्याच्या ज्ञानाची तशी माझ्याकडे बोंबच. सिनेगॉग मी तरी पहिल्यांदाच पाहात होतो. वाईटहि नाही. खाली साधारण फरशी, नीट आठवत नाही पण बहुधा बुद्धिबळाच्यापटाप्रमाणे मांडून बसवलेल्या काळ्या व पांढर्‍या लाद्या असाव्यात. छतावर झुंबरे, एका बाजूला एक लाकडी सज्जा ऊर्फ बाल्कनी. विविध प्रकारचे दिवे, हंड्या. काही पितळेच्या चकचकीत वस्तू. आता फारसे काही आठवत नाही. मला स्वारस्य नसल्याचा परिणाम असावा. माझा नेहमी हवेत रहाणारा रथहि जमिनीवर येऊन बहुधा चाकहि रुतले होते. वाचकहो क्षमस्व. पाहायला आलेले प्रवासी तुरळकच. आमच्याव्यतिरिक्त जेमतेम दहापंधरा असतील. बाहेर पडतांना टेबलावर माहितीपुस्तके विकायला ठेवली होती. ज्यू धर्माचे काहीच ठाऊक नाही म्हणून एक पुस्तिका घेतली. त्यांच्या देवाला येहोवा म्हणतात असे नंतर कधीतरी ऐकले. आत्ता इतक्या वर्षांनी ती पुस्तिका शोधून काढली. व्यवस्थित जपून ठेवल्यामुळे पट्कन सापडली. लिहायसाठी त्यात काही माहिती मिळते का पाहायला. कोणा एकाने पी एच डी करतांना प्रबंधासाठी माहिती जमवली. त्यातलीच थोडी छापली आहे. आकर्षक असे त्या पुस्तिकेत काही नाही. वास्तविक शाळेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात विजयनगर, फत्तेपूर सिक्री, पेशवाईतले पुणे इ. वर्णनें फार मनोरंजक रीतीने लिहिली आहेत. या पुस्तिकेतील वर्णन मात्र इतके नीरस आहे - निदान मला तरी वाटले - की बोलून सोय नाही किंवा सोलून बोय नाही. पाऊणेक तासात बाहेर पडलो. पण आयुष्यात एखादे तरी सिनेगॉग पाहायचेच होते. चर्चेस मशिदी पाहिल्या आहेत. मग सिनेगॉग का नको? स्तूप, विहारहि कधीतरी पाहाणार आहे.

निघालो एकदांचे. हुश्श केले. गाडी चालायला लागली की बरे वाटते. पुढे येणारे गाव कसे असेल याचे कुतूहल पुढच्या क्षणाची अनिवार ओढ घेऊन येतें. आयुष्य कसे छान प्रवाही वाटते. मागील मधुर क्षणांच्या हळुवार स्मृतींच्या धुक्यातून पुढें येणार्‍या नव्या क्षणाचे अज्ञात रंग मस्त गहिरे होतात. मन पुढे येणार्‍या ताज्या क्षणाच्या स्वागतासाठी एकदम टवटवीत होऊन जाते.

आता संध्याकाळ होइस्तोवर पुढे जायचे आणि चारनंतर बरेसे हॉटेल पाहून मुक्काम ठोकायचा असा विचार होता. रा. म. मा. १७ नेंच पुढें जात राहिलो. चवक्कड गेल्यानंतर अचानक काम चालू रस्ता बंद चे एक डायव्हर्शन आले. पुढचे मार्गदर्शक गाव होते पोन्नान्नी. आश्चर्य म्हणजे हा रस्ता चांगल्या अवस्थेत आणि कमी रहदारीचा होता. मार्गदर्शक दगड मात्र नव्हते. दिवस किंचित कलला होता म्हणून सूर्य डावीकडे ठेवून उत्तरेच्या दिशेने जात होतो. मास्तरांनी नकाशा काढला. त्यात हा रस्ता दिसत होता. पण हाय रे दुर्दैवा. मास्तरांचा चष्मा बॅगेत राहिला. दिशादर्शकाचे काम माझ्याकडे. एक नाका आला. रस्त्याला चार फाटे फुटत होते. एक समोर किंचित उजवीकडे बाकीचे तीन तीन कोनांतून डावीकडे. नकाशांत तीनच फाटे. सर्वात डावीकडचा फाटा किंचित मागच्या बाजूला जाणारा. हा बहुधा समुद्रकिनारी जात असावा. डावीकडून दुसरा फाटा रा. म. मा. १७ ला मिळायला हरकत नसावी. तो फाटा पकडला. १० किमी. गेले, वीस गेले, रा. म. मा काही दिसेना. रस्त्याला दगड दिसेना. मधूनच गाववजा शहर लागे. सगळ्या पाट्यांवर जिलेबी. कुणाला विचारावे तर कुणालाहि इंग्रजी वा हिंदी येत नाहीं. एकदोनदा कोझोकोडे व्हेअर असे विचारले. पण फोल. एकानें एक दिशा दाखवली. लगेच पूल लागला. दोन रुपये टोल भरला. पलीकडे गेलो. पुन्हा एकाला विचारले. त्याला इंग्रजी येत होते. त्यानें पुन्हां पूल ओलांडून परत जाऊन फर्स्ट लेफ्ट सांगितलें. पुन्हा २ रू. टोल भरून पहिल्या रस्त्याला लागलों. एन एच सेव्हन्टीन पण कोणाला कळत नव्हते. संध्याकाळ होऊ लागली. पुढच्या नाक्यानंतर अचानक रस्ता व परिसर ओळखीचा दिसायला लागला. आणि पाचहि जणानी सुस्कारा सोडला. हे जाताना लागलेले इडप्पल होते. पुन्हा हॉटेल बॉम्बे. लग्नाच्या सभागृहाला लागून असलेले. सुदैवाने लग्नकार्य नव्हते व सभागृह रिकामेच होते त्यामुळे हॉटेल मिळाले.


वाट फुटेल तिथे - ७

टेकडी आणि बॅकवॉटर्स

०८-१०-२०००.
कोडाईकनाल
अपेक्षेप्रमाणे नवी पहाट नवी आशा, नवी चेतना घेऊन आली. आता नवा सूर्य नवी झळाळी घेऊन येणारच. काल आमच्या हॉटेलांत बरेच प्रवासी आले होते. मॅ. सा ना बिल तयार करायला सांगितले. पण नव्या प्रवाशांच्या गर्दीमुळे हॉटेलच्या सेवकावर फार ताण पडला. तरी आमची गाडी त्यानें स्वच्छ धुवून दिली. धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या स्वप्नमय वातावरणात प्रभातफेरी झाली. भाऊ मोरोबा साथीला होतेच. सुदैवाने वीजपुरवठा सुरळीत असल्यानें गीझर व्यवस्थित चालू. मस्त गरम पाणी. स्नान करायला मजा आली. नार्‍याच्या घरीं त्याची मेहुणी तिच्या आईची सेवा करायला अपरात्रीं हजर झाली होती. त्यामुळें सौ नारकर व मुलांना चांगलें मानसिक बळ मिळाले. सौ. नारकर आणि त्यांच्या मातोश्री दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आता नार्‍याला दौरा अर्धवट सोडायचे कारण नव्हते.

सरवानला उदार आश्रय देऊन भरपूर सांबार आणि तीन प्रकारच्या चटण्या आणि न्याहारीनें तृप्त होऊन पुन्हा नव्या उमेदीने निघालो. पुढचा मुक्काम होता टेकडी. एके ठिकाणी टेकडी अशी इंग्रजी अक्षरे दिसली. अरे तीनच अक्षरे आहेत. मल्याळी आणि तमिळ पण टेकडी कसे लिहितात पाहा. आम्ही खरेच दोन्ही लिप्यातले टेकडी वाचायला शिकलो. तमिळ टेकडीला आपली नक्षी आणि मल्याळी टेकडीला आपली जिलबी असे सार्थ नामकरण झाले. टेकडी लिहिलेलें नसेल तर जिलबी वा नक्षी आपली नाही असे साधे सोपे सरळ समीकरण. काही दगडावर अन्य गांवांची नावे होती. आपली नक्षी वा आपली जिलबी दिसली की फारच गंमत येई. चालक सोडून इतर चौघेजण एका सुरात ओरडत होतो आपली नक्षी वा आपली जिलबी.

निसर्गाची एक गंमतच आहे. पूर्व किनारा किमान ५० कि.मी. दूर. पण अगदी कोंकणात किनार्‍यालगत असते तेवढी भरपूर वाळू दिसे. ताड माड दिसत. जणु पाच मिनिटे चालल्यावर समुद्रच दिसेल. रस्त्यावर वा गावात कुठे गावाचे नाव वगैरे लिहिलेले नसेल तर हा चकवाच म्हणायचा. अधूनमधून शहाळी, ताडगोळे, तोतापुरी कैर्‍या, तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, रस्त्याकडेला विकायला ठेवलेले दिसत. एके ठिकाणी मस्त लुसलुशीत रसदार ताडगोळे खाल्ले आणि शहाळ्याचे गोड पाणी पिऊन तृषा भागवली. बहुधा दहा रुपयांना बारा ताडगोळे होते. आणि दहा रुपयांना एक शहाळे होते. आता नक्की आठवत नाहीं. तेणीला उजवें वळण घेतले आणि टेकडीचा रस्ता धरला. तेणीवरून मदुराई ४८ कि.मी. आहे म्हणजे समुद्र किती दूर आहे पाहा. झाडोरा वाढायला लागला, चढ लागला आणि हवेंत गारवा आला.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

माध्यान्हीच्या सुमाराला टेकडी आले. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण. सगळे जण निसर्गसौंदर्यानें हरखून गेलों. तहानभूक विसरलों. वनखात्याच्या चौकीवर नोंद करून आंत गेलों. प्रथम बोट क्लबवर गेलों. साडेअकराची सहल नुकतीच गेली होती. पुढची दोनला होती. समोरच एका सुरेख ठिकाणीं खानपानसेवा होती. पण पदार्थ बर्गर, समोसा, पॅटीस वगैरे. बनवून ठेवलेले, थंडगार, शहरी आणि यथातथाच दिसले. उर्दूवाचन भरमसाट. दर पाहूनच होती नव्हती ती भूक मेली. बहुधा ही पाश्चात्यांची सोय असावी. केरळ नाहींतरी खाण्याच्या दृष्टीनें कुचकामीच. राहाण्याचें हॉटेल शोधायला लागलों. जवळजवळ सगळीं हनिमून हॉटेल्स. छतात आरसा बसवलेली. दर प्रचंड महागडे. सुंदर निसर्ग पाहून दोन रात्रींचा मुक्काम करायचा विचार करीत होतो. अर्धा तास फिरूनहि योग्य तसे आखूड शिंगी बहुदुधी हॉटेल गवसेना. आम्हीं चैन करायला नक्कीच निघालो नव्हतो. निसर्ग सुंदर पण खाण्यापिण्याची बोंबच. पैसेहि फार लागणार. सोळाशे रुपयाखालीं बरेसे आणि पार्किंग चांगले असलेले हॉटेल तेव्हा गावलेच नाही. आता बरीच झाली आहेत. टेकडीपासून चार किमीवरच्या कुमिली गावात. तेव्हा काही नव्हते. चालक अर्ध्या तासाच्या विश्रांतीने ताजेतवाने झाले होते. दहावीस कि.मी. वर चांगले आणि वाजवी दरांतले हॉटेल मिळाले तरच मुकाम करायचा नाहींतर मुक्कामच रहित.

मुक्काम रहितच करावा लागला. दर ठीक तिथे पार्किंग नाही, पार्किंग होते तिथे दर चढे. काय करणार? जसजसे घाट उतरलो तसतशी थंड हवा मांजराच्या पावलाने कधी पळाली पत्ता लागला नाही. मात्र झाडोरा तसा कमी झाला नाही. फक्त झाडे बदललीं. आता माड, केळी वगैरे जास्त दिसायला लागले. वातानुकूलनावर जास्त भर दिला. चढउतार फारसे नव्हतेच. तापलेल्या हवेमुळे भूक तशी मेलीच. पण त्याचा फायदा असा झाला की अंतर पटापट कापले गेले. जेवायला कुठे थांबलोच नाही. आता बॅकवॉटर्स पाहायचे होते. कोट्टायमहून. तीनसाडेतीनला कोट्टायम ५० च्या आसपास कि.मी. ची पाटी दिसली. म्हणजे तासाभरात कोट्टायम. तिथे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी बॅकवॉटर्स असे काहीसे ठरवत होतो. चारलाच कोट्टायम आले. इथून १४ कि.मी. बॅकवॉटर्स आहे. अचानक साक्षात्कार झाल्यासारखा चक्रधारी मास्तर बोलला, अरे बॅकवॉटर्स बघायला दोनेक तास लागतात. आताच गेलो तर. समजा व्यवस्थित पाहून झालें तर कोट्टायमहून उद्या सकाळीच निघू शकतो. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. थेट बॅकवॉटर्सला पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती. तुरळक चुकार लोक होते. सहज चौकशी केली. शेवटची फेरी नुकतीच गेली होती. पाचजणांसाठी खास फेरी मिळेल का, असेल तर किती पैसे हे चाचपायला लागलो. एक दिवस वाचला तरी एक दिवसाच्या मुक्कामाचे किमान हजारेक रुपये, किंबहुना जास्तच वाचणार होते. ते पैसे दुसरे ठिकाण पाहायला सत्कारणी लावता येणार होते. दोन तास चांगला उजेड असेल तोपर्यंत फिरवायला त्याने बाराशे मागितले. तरीहि उजेड राहिला तर ताशी सहाशेच्या दराने देऊ म्हणून सांगितले. इतर कोणीहि उतारू न घ्यायच्या बोलीवर. जाड्याने अर्धे इंग्रजी अर्धे मोडतोड हिंदी बोलत मस्त सौदा पटवला. हिंदीची मोडतोड त्या माणसाने केली बरे. पण आम्ही ते पाप जाड्याच्याच पदरात टाकले. या मुंजाचे एखाद्या भय्यिणीशी लग्न लावले तरच त्याचे हिंदी सुधारेल असे इतर चौघांचेहि मत झाले. त्या मताशी बोटीचा कप्तान, त्याचा किलींडर आणि गाईडहि सामील झाले. काय ते त्या महाभागांना कळलें कीं नाहीं कोण जाणें. असो. त्यालाहि आता गिर्‍हाईक मिळण्याची शक्यता नव्हती, आम्हालाहि इतर उतारूंचा उपद्रव नव्हता. गाईडचे पैसे वेगळे. केवळ सव्वाशे.

उतरत्या लालसोनेरी उन्हात बॅकवॉटर्सचे रंग आणखी गहिरे झाले. सुरुवातीचा फोटो काढायचा उत्साह सोडला तर त्या गहिर्‍या रंगानी आम्हाला अंतर्मुख केले. निसर्गसुंदर बॅकवॉटर्सने आम्हाला मंत्रमुग्धच केले. एकच गालबोट. यांत्रिक होडीच्या इंजिनाचा प्रचंड आवाज शांततेच्या ठिकर्‍या उडवतो. मला राहवले नाही. मी त्या कप्तानाला अधूनमधून इंजिन बंद करायला सुचवले. इंजिन बंद केल्यावर जी शांतता अनुभवायला मिळते कीं ज्याचें नाव ते. किनार्‍यावरून झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, विविध आकारांच्या स्टीलच्या बांगड्या जमिनीवर पडल्यासारखा आवाज करणारे तिथल्या लोकांचे बोलणे अस्पष्टसे ऐकू येत होते, झाडांतून ऐकू येणारी वार्‍याची सळसळ, पार्श्वभूमीला पाण्यातून येणारे चुळुक् चुळुक् चुळुक् आवाज स्वर्ग तो काय अजून वेगळा असतो? उगीच नाहीं केरळला देवभूमि म्हणत! गाईडने पण मधून इंजिन बंद करायच्या कल्पनेला मनापासून दाद दिली. खरेंच, इतकी संशोधने होताहेत. आतां नवीन मोटारीचे इंजिन चालू आहे की बंद हे चालकाच्या जागेवरूनहि कळत नाही. आवाजहि नही करता ही फ्रीजची जाहिरात आठवली. पण होड्यांचीच इंजिनें अशी का? कपिल देवला सांगायलाच पाहिजे. पाम ऑलिव्हदा सारखा यालाहि जबाब नाही. पण वेगळ्या अर्थाने. गाईडला तीनशे रुपये दिले. पण लालसोनेरी संधिप्रकाशांतल्या गहिर्‍या रंगांचे ते दिव्यत्वाचा स्पर्श असलेले अनुभव? त्याची किंमत आपण पैशांत करू शकतो का?

भरजरी लालसोनेरी निसर्गांत हळूहळू काजळमाया मिसळूं लागली. पाण्याच्या गर्द निळाईंत आता विश्वकर्मा श्यामरंग भरायला लागला होता. त्या गर्द पार्श्वभूमीवर झाडांचे शेंडे वेगळेच दिसत होते. संध्याछाया मारवा सोहनी आणि पूरियाचे अनोखे रूप दाखवत होत्या. एक अपूर्व अनुभव मनांत साठवत तरंगतच कोट्टायमकडे परतलो. रा.म.मा. १७ ला लागूनच एक चकाचक हॉटेल मिळाले. सुरेख पार्किंग, स्वच्छ नीटनेटके स्वागतकक्ष, तत्पर सेवकवर्ग, प्रशस्त आणि आकर्षक डायनिंग हॉल. रु. साडेतीनशें नॉन ए.सी. डबल ऑक्युपन्सी. तरीहि घासाघीस केलीच. मुंबईकरांचा भाव मारलाच. मुंबईकरांकडे सगळीकडे अतिशय आदराने पाहिले जाते बरे का. पुणेकरांना पार्श्वाग्नि होईल कदाचित, पण हे खरेंच आहे. पुणेकर मास्तरांना आम्हीं याची जाणीव करून द्यायला विसरलों नाहीं. पण ‘मुळांतला मी मुंबईकरच आहे. हल्लीच तर पुण्यात आलो.’ अशी मखलाशी त्याने केली. मुंबईकरांचा विजय असो. १० टक्के सवलतीचा दर मिळाला. हवा मुंबईपेक्षा किंचित जास्तच गरम. पण प्रदूषणमुक्त. स्वच्छ, प्रशस्त, आकर्षक रंगसंगतीच्या, सुरेख पडदे लावलेल्या खोल्या, मोठ्ठ्या खिडक्या आणि चांगले वायुवीजन. नॉन ए.सी. च खोल्या घेतल्या.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ६


कोडाईकनाल

०७-१०-२०००:
गाडी साडेआठ वाजता येणार होती. कमालीची थंडी होती. तपमान दहाच्या खाली असावे. कमालीची आर्द्रता होती. या आर्द्रतेमुळे मुन्नारपासून ओले असलेले नार्‍याचे व जाड्याचे कपडे जसेच्या तसे ओलेच राहिले. अजिबात वाळले नाहींत. त्यांना भरपूर चिडवले. लॉंड्री चालवायचे सोडून इथे काय करतां? तीहि चालवायची अक्कल नाही. नाहीतर कपडे ओलेच कसे राहिले? तुमच्या कपडे वाळवण्यातच काहीतरी चूक आहे वगैरे वगैरे. पण ते महापुरूष कांहीच ऐकू न आल्याचा बहाणा करीत होते. शेवटी ते एका इस्त्रीवाल्याकडून रांगेत उभे राहून कपडे वाळवून आले. इथे आल्यानंतर लोकांची अक्कल गायब होते कीं काय? बर्‍याच जणांनी कपडे धुतले होते वगैरे असावेत आणि ते वाळवण्यासाठी इस्त्रीवाल्याकडे आले होते. आम्हा इतर तिघांची लोकोत्तर पुरुष असल्यामुळे गोष्टच वेगळी.

आता आमचे कपडे कां ओले नव्हते हा प्रश्न वाचकांच्या सुपीक डोक्यात येणारच. याची गंमत सांगायलाच पाहिजे. अर्ध्यापॅंटचा एक तोटा म्हणजे गाडीत बसल्यावर ऊन आले तर मांडीपासून खालचे उघडे पाय फार भाजतात. या त्वचेला ऊन खाण्याची सवय नसते. मी ओला टॉवेल वगैरे कपडे पाय भाजू नयेत म्हणून पायावर घेत होतो. उन्हापासून संरक्षण तसेच कपडे पण वाळतात. पाहा किती हुशार मी. माझे पाहून देवाने व मास्तरांनी पण तसेच केले. कोडाई येण्यापूर्वी आमचे तिघांचे कपडे पूर्ण वाळले होते. अर्थात वातानुकूलन बंद असतांना. अख्खी पॅंट घातल्यामुळे जाड्या व नार्‍याला मात्र मात्र तसे करता आले नव्हते. हे दोघे कपडे वाळवून घेत होते तोपर्यंत आम्ही फेरफटका मारून आलो. आम्ही चविष्ट न्याहारी करून आलो म्हणून खोटेच सांगितले. पण ती थाप पचली नाही.

न्याहारीसाठी येथे सरवानपेक्षा जास्त चांगले काय असणार? तेथील एस्. टी. स्टॅंडसमोर आहे. तुरळक पाचदहा लोक उपस्थित होते. ऑर्डर दिली. तेवढ्यांत एकदम वीसपंचवीस तरुणांचे टोळके आंत घुसले. उरलेल्या सगळ्या जागा भरून गेल्या. कांही तरूण उभेच होते. उभ्याउभ्याच त्यांनी न्याहारी केली. तमिळमधून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत होते. वेटर घेऊन येत असलेले सगळे पदार्थ ते मधल्यामधे त्याला अडवून घेत होते. आमच्यासारखे इतर लोक नुसते वाट पाहात स्वस्थ बसून होते. सगळ्यांचे रंग एकसारखे. मी त्यांच्यापुढे गोरा दिसायला लागलो. माझी रंगाची ऐट जिरल्याबद्दल इतर चौघांनी आनंद व्यक्त केला. अर्ध्यापाऊण तासाने ते त्रस्त समंध शांत झाले व बिल देऊन निघून गेले.

हिरवी चटणी, चिंचेची चटणी व टोमॅटो चटणी अशा तीन प्रकारच्या चविष्ट चटण्या व स्वादिष्ट सांबार भरपूर मनसोक्त प्रमाणात. इडल्या, डोसे, चांगले होते. जाड्यासाठी पोंगलहि होताच.फिल्टर कॉफीहि छान. अजून आठहि वाजले नव्हते. तेथून सरळ ज्या एजन्सीत गाडी बुक केली होती तिथे गेलो. म्हटले हा आपल्या हॉटेलवर जाऊन वाट बघणार, त्यापेक्षा आपणच तिथे जावे.

या गाडीचा विशीतला ड्रायव्हर तमिळ मुस्लिम होता. मुस्लिम असल्यामुळे त्याला थोडेफार हिंदी येत होते. पण हिंदी बोलतांना त्याला फार त्रास होत होता. अक्षरश: जिवाच्या आकांताने हिंदी बोलतोय असे वाटत होते. इथे देखील आता प्रचंड गर्दा होता. गर्दी म्हणून कल्पना येणार नाही. म्हणून गर्दा. पण आमचा ड्रायव्हर कम गाईड चलाख होता. स्थानिक ड्रायव्हर असल्याचा फारच मोठा फायदा झाला. येथील वाहातुकीचे नियम वेगळे होते. शिवाय प्रत्येक ड्रायव्हरचे नियम वेगळे होते. दहावेळा तमिळमधून खडखडाट करीत तोंड वाजवले तरच आपल्या वाटेतील एक गाडी बाजूला होणार. अन्यथा नाही. ती बाजूला झाली की दुसरी मधे आहेच. तेल्लीचेरीचे ड्रायव्हर जरूर लाजले असते. मुंबई पुण्याच्या ड्रायव्हरांची फार म्हणजे फारच गोची झाली असती. असो.

येथे एक हनीमून पॉइंट (कदाचित नाव वेगळे असेल) आहे. तेथेच सर्वप्रथम गेलो. येथील दरीच्या कडेने जाणारा वॉक घेतला की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. एखाद्या लोकप्रिय नटीच्या फॅन क्लबची इथे सहल आली तर तिचे काय होईल? असो. अतिशय थंड आणि उत्साहवर्धक हवा, आजूबाजूला आनंदाने आणि उत्साहाने भारलेला जनसमुदाय. दिवाळीत दादरला रानडे रोडवर असते तशी मोदभरी उत्साही गर्दी. पण आश्चर्य म्हणजे इथे लोकांनी चक्क रांग लावली होती. डाव्या बाजूला उंच जाणारा खडकाळ कडा आणि उजव्या बाजूला खोल दरी. तीत गच्च अरण्य. कांही ठिकाणी कठडा केलेला. याला हल्ली मराठीमध्ये ’रेलिंग’ असे म्हणतात. काही ठिकाणी जाळी. म्हणुन अपघात फारसे घडत नसावेत. पण अतिशय निसर्गरम्य ठिकाण. आता साताठ वर्षानंतर आठवत नाही. पण इथे चांगले पंचवीस वा पन्नास रू. दर माणशी असे शुल्क भरले होते. पण पैसा वसूल. वाटेत बारीक चिरून मीठमसाला पेरलेले पानावर दिले जाणारे कच्चे तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, केळी, इ. रानमेवा होताच. वातावरण ढगांनी वेढलेले. मध्येच दाट ढग येऊन चार फुटावरचे देखील दिसेनासे होई. मध्येच भास्करराव दर्शन देत. क्षणाक्षणाला बदलणारी प्रकाशयोजना. असे उत्कट क्षण कसे विसरता येतील. आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट प्लास्टीकच्या पिशव्या कुठेहि नव्हत्या. हे लक्षात आल्यावर फार बरे वाटले. जवळजवळ पाचसातशे मीटरचा वॉक आहे. रम्य वातावरणात रमतगमत चांगला अर्धापाऊण तास आपण घालवतो. बरेच लोक जथ्यांनी आलेले होते. त्यांचे आपापसात मोठमोठ्याने हास्यविनोद करून खिदळणे चालू होते. पण तमिळमध्ये. त्यामुळे सतत ताशाचा खडखडाट व मधेमधे हास्यपेरणी असे वाटत होते. ओ का ठो कळत नव्हते. वॉक संपल्यावर आपण दुसरीकडेच उगवतो. अगदी दूरवरची वेगळी जागा. पण आपला चतुर सारथी आपल्या स्वागतास उपस्थित असतो. रस्त्याने हे बाहेर पडण्याचे ठिकाण आत शिरण्याच्या ठिकाणापासून अडीच एक कि.मी. दूर आहे असे त्याने सांगितले. पाहा स्थानिक गाडी केल्याचा फायदा किती ते. नाहीतर आम्हाला तासभर वेळ लागला असता मूळ ठिकाणी जाऊन गाडी शोधायला. इथले जसे ड्रायव्हिंग लोकोत्तर आहे तसे पार्किंगदेखील. कोणत्याहि गाडीसमोर कशीहि आडवीतिडवी गाडी उभी करतात. तुमची गाडी कशी बाहेर निघेल ते बघायला परमेश्वर समर्थ आहेच. गाडी पार्किंगमधून बाहेर काढतांना त्याने किमान आठदहा जणांशी तमिळमधून सुखसंवाद केला. आपण तर संध्याकाळपर्यंत तेथेच अडकून पडू. पण या पठ्ठ्याने पंधरावीस मिनिटात गाडी बाहेर काढली.

लिरील साबणाची दूरदर्शनवर एक जाहिरात आली होती. लाऽऽ लारालारालाऽऽ ची लकेर असे साथीला. ते चित्रीकरण इथेच झाले होते. या धबधब्याला लिरील धबधबा असे म्हणतात. खरेच नितांतसुंदर ठिकाण आहे. इथे आपण छायाचित्रे काढतोच. ट्विन रॉक्स म्हणून एक ठिकाण (पॉईंट) आहे. दरीपाशी उभे राहून समोर दरीपलीकडे एकमेकींना बिलगून उभ्या असलेल्या दोन प्रचंड शिळा दिसतात. तेच ट्विन रॉक्स. दाट धुक्यामुळे समोर दरी आहे की डोंगर आहे तेच कळत नव्हते. दरीपलीकडचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे छायाचित्रे विकणार्‍यांना फारच चेव आला होता. मोडतोड विंग्रजी बोलत पोस्टकार्ड आकाराची छायाचित्रे घ्या म्हणून मागे लागतात. त्यांच्याकडील तॊ छायाचित्रे पाहूनच कळले की ते ट्विन सॉक्स कसे दिसतात. आम्ही खरोखरच ट्विन रॉक्सपाशींच होतो की नाही कोण जाणे. सगळीकडे ढग, ढग आणि ढग. गिरगांवात ‘भाऊ मोरोबा ढगे’ म्हणून एक दुकान होते. बहुधा कापडाचे. अजून आहे की नाही ठाऊक नाही. म्हणून ढगांचे आम्ही ‘भाऊ मोरोबा’ असे पूर्वीच्या एका माथेरान सहलीत बारसे केले होते. ढग आला की ‘भाऊ मोरोबा’ आले रे आले असे ओरडत होतो. ते चालू ठेवले. आमचे शब्द कानावर पडणार्‍या एखाद्या तमिळ माणसाला थोडेफार मराठी कळत असते तर त्याने ढगाला भाऊ मोरोबाच म्हटले असते. अशाच अनेक गंमती जंमती. खरेच प्रत्येकात एक आठदहा वर्षांचा व्रात्य मुलगा दडून असतो. सहलीवर तो जागॄत होतो. हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.

दिवसभर मनमुराद भटकलो. संध्याकाळ झाली तसे हॉटेलवर पोंचलो. नांदेडकर मॅसांनी मराठीतून नमस्कार असे अभिवादन केले. हे होते तसे मनमिळाऊ आणि व्यवसायिक. पण त्यांच्या चेहर्‍यावर एक तुसडेपणची झांक होती. म्हणूनच हॉटेल रिकामे असावे कां? की गांवाच्या कडेला असल्यामुळे? असो.

रात्री पायी फिरायला गेलो. दोनएक कि.मी. त्या हवेत हे फारसे मोठे अंतर नाही. वरूणराजांनी अजिबात त्रास दिला नाही. मास्तरांनी मुलीसाठी जीन्सची खरेदी केली. घासाघीसमहर्षि मदतीला होतेच. आता गुढगे टेकणे. मास्तर व देवाचे गुढगे टेकून झाल्यावर शेटजींनी नंबर लावला. गुढगे टेकून परत आला आणि पाहातो तर काय? त्याचा चेहरा पूर्ण विस्कटला होता.

फोन त्याच्या नववीत असलेल्या मुलीने घेतला होता. ती प्रथम कांही बोलूच शकली नाही. फक्त रडली. आजी (शेटजींच्या सासूबाई) अत्यवस्थ. आईला ताप आलाय. काय करूं? छोटा भाऊ जेमतेम चौथीतला. तो काय तिला आधार देणार? नार्‍याला त्वरित घरी जाणे आवश्यक होते. त्वरित जायलाच पाहिजे असे स्पष्ट दिसत होते. पण कसे? तीन विमानतळ जवळ होते. कोईंबतूर, चेन्नई आणि कोचीन. एकहि ठिकाण आत्ता रात्री जाण्यासारखे नाही. विमनस्क मनस्थिती म्हणजे काय! याचा अनुभव आम्हांला मिळत होता. बरीच चर्चा झाली. काथ्याकूट झाला. त्याला कोणत्यातरी विमानळावर आम्ही सोडायचे हे नक्की झाले.

आता विमानाची वेळ. पर्यटनाचे ठिकाण असल्यामुळे येथे ट्रॅव्हलिंग कंपन्या अनेक आहेत. एवढ्या रात्री शेवटी एक उघडे मिळाले. सुदैवाने त्याला थोडेफार इंग्रजी येत होते. फिरंग्याने हे एक काम फार चांगले केले. फिरंग्याच्या भाषेमुळे आपल्याला दाक्षिणात्यांशी संपर्क साधता येतो. विमानफेरीच्या वेळा पाहिल्या. चेन्नईपासून बरीच होती. पण चेन्नईला पोचायला एक दिवस जास्त लागणार. मी म्हटले अरे उद्यापर्यंत परिस्थितीत बरीच सुधारणा होईल. दिवस तसेच थोडेच राहाणार?
म्हणजे काय होईल?

दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आणि व्यावहारिक दृष्टीने विचार कर. मास्तर म्हणाले तुझ्या उपस्थितीने काय फरक पडणार? जे काय करायचे आहे ते डॉक्टरच करणार. तू फक्त विशिष्ट वळणावरचे निर्णय घेणार. ते तू इथे राहून पण घेऊं शकतो. फक्त तुझ्या उपस्थितीने तुझ्या मुलीला व दोन्ही रुग्णांना मानसिक बळ मिळेल. तू पुन्हा तिला फोन लाव. तसे तिला समजावून सांग. पाहिजे तर आम्ही पण तिच्याशी बोलतो. तत्पूर्वी तिला ज्या दोन सख्ख्या मावशा आहेत त्यांना पण सतर्क राहायला सांग. त्या मुलीला मानसिक आधार मिळणे महत्त्वाचे आहे. जरूर पडल्यास तू केव्हाहि निघू शकतोस व दोन तासात पोहोचू शकतोस असे सांग. इतर दोघांचेहि असेच म्हणणे पडले.
क्रमश:

वाट फुटेल तिथे - ५

Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ५
मुन्नारवर स्वारी: ५ ऑक्टोबर २०००:

ठरल्या प्रमाणे सकाळी साडेआठला न्याहारीसाठी त्याच हॉटेलात थडकलो. ३०-४० मिनिटांची प्रभातफेरी झाली होती. हॉटेलचे बिल मिळाले नव्हते. बिलबाबू नऊ वाजता येणार होता. साडेआठलाच दुपार झाली होती. दिवस उजाडल्याबरोबर दुपार होणे ही कल्पना माझी नाही बरं का. प्र. श्री. नेरूरकर यांची. एका सर्कसबरोबर ते आफ्रिकेच्या दौ-यावर गेले होते. सर्कसबरोबर (माझ्या आठवणीप्रमाणे) ३०-४० दिवस राहिले व प्रवासवर्णन लिहिले. त्यात त्यांनी तसे म्हटले आहे. असो. तर साडेआठच्या टळटळीत दुपारी बाहेर पडलो. उकाड्यामुळे कांही सुचत नव्हते. रंगीत गरम पाणी आजसुद्धा सगळ्यात चविष्ट पदार्थ होता. इडल्या डोसे साधारण होते. सांबार सपक आणि अळणी. गरम असून त्यात रामच काय भरत शत्रुघ्नदेखील देखील नव्हते. दिवसभर खायला मिळणार नाही म्हणून कसेतरी खाऊन घेतले. आमचे खाऊन होता होता तेथे काही स्थानिक लोक खाण्यासाठी आले होते. त्यांच्या पुढ्यात लालभडक सांबार दिसले. त्या हिंदी जाणणार्‍या एकमेव वेटरला ते काय म्हणून विचारले. ते येथील नेहमीचे सांबार आहे. भौत हॉट्ट होता है. आप बंबई के. इत्तना हॉट्ट कैसे खायेंगे? इसलिये आपके लिये ये स्पेशल अल्लग बन्नाया. कपाळावर हात मारायचा बाकी होता. आणखी एका इडली सांबाराची पण त्या नेहमीच्या तिखट, ऑर्डर दिली. फक्त मीठ कमी होते. ते मागविले. बाकी सुरेख होते. मग आणखी मागविली. मीठहि मागवले. आता संध्याकाळपर्यंत तग धरायला हरकत नव्हती. दोघे पेट्रोल भरायला, हवा चेक करायला गेले. तोपर्यंत आम्ही तिघांनी बिल भरून चेक आऊट केले.

अरे नुसते बटाटे घेतले असते तर या हवेत अर्ध्या तासात उकडून मिळाले असते. कोणतरी एक म्हणाला.काढ की तुझ्या डोक्यातले. नको सडलेले असतील. तिसरा. एका वेस्टर्न इंग्रजी सिनेमात (जॉन वेन की काय आठवत नाही) अशा कडक उन्हात दोन माणसे, चरबरीत दाढी वाढलेली त्यांची, एक दुसर्‍याशी पैज लावतो. अंडे फोडून दगडी दगडी फरशीच्या पदपथावर फोडून टाकतो आणि ते शिजते. तो पैज जिंकतो. ते मला आठवले.

जाड्या पैज, अंडे टाकले तर शिजेल. मी. मला सनी साईड डाऊन पाहिजे आहे. आणि ते उलटेपर्यंत तुझ्या कौशल्याने त्याचे स्क्रॅंबल झालेले असेल. त्या हलकट नीच आणि पाजी इसमाने रसभंग केला.
त्यापेक्षा तूच रस्यावर का बसत नाहीस? रोस्टेड पोर्क खायला मिळेल. मी सूड उगवला.
हा शेटजी बघ काही काम करत नाही. अरे अंडी घाल रस्त्यावर निदान काहीतरी चांगले खायला मिळेल. मी.
सध्या खुडुक आहे. शेटजी.

मग कोंबडीच खाऊ. रस्त्यावर भाजेल का रे? नुकताच आलेला मास्तर.
चवदार अन्नाला देखील नाक सॉरी चोच मुरडणारी आहे. कशी चांगली लागेल? जाड्या.
गरम हवेचा त्रास कमी करण्यासाठी असे आचरट संवाद चालू होते.

आता सगळेच आठवत नाहींत.रात्री राहायला चांगले हॉटेल एवढ्या स्वस्तात मिळाले मिळाले ही काय छोटी गोष्ट होती? चलो मुन्नार.

मुन्नार बहाबळेश्वरपेक्षा जास्त उंचावर आहे या कल्पनेने भारून गेलो. तेथे दोन रात्र राहायचे आणि पोटभर खायचे असे ठरले. साडेनऊच्या सुमारास निघालो. सरळ रस्ता असल्यामुळे प्रथम वातानुकूलन सुरू केले. उकाडा थोडा सुसह्य झाला.

उकाड्याची एक गंमत आहे. दिवस उगीचच लांबलचक आणि कंटाळवाणे वाटतात. वेळ घालवण्यासाठी लेफ्ट पो, राईट्ट पो, नेऽऽर पो (नेर = समोर) अशा सूचना सारथ्याला प्रत्येकजण देत होता. केवळ एकमेकांच्या बरोबर होतो आणि आचरट गप्पा चालू होत्या म्हणून सुसह्य झाले. साथीला (रोगाच्या नव्हे) तोंडी लावायला विचित्र केरळी उच्चार होतेच. तोंडी लावायला चांगले असले की पोट भरते. अधूनमधून संगीत होतेच. लता-आशा, बाबूजी, किशोर, रफी खळेसाहेब, नौशाद, मदनजी, रोशन, आर. डी. इ. चे आभार मानले. कोचीनच्या जवळ मुन्नारला जाणारा फाटा फुटतो. वातानुकूलन बंद केले. आता रस्ता विचारायला पाहिजे होता. म्हणून काचा खाली. मुन्नार कोठे कोणालाच ठाऊक नाही. एका केमिस्टच्या दुकानात विचारले. त्यांना अगम्य भाषेची सवय असते आणि इंग्रजीहि येते.

’ओ, यू मीन मुन्णार. हा ’न्णा’ मनोरंजक होता. धड ’न’ नाही व धड ’ण’ पण नाही. मग आम्ही तसा उच्चार करून विचारले तर प्रत्येकाला बरोबर कळले. संस्कृत भाषा की जय. आपलेच उच्चार बरोबर. पण न आणि ण च्या मध्ये एखादे व्यंजन असते तर बरे झाले असते. स्थानिक लोकांचा त्याच प्रदेशातील गावाच्या नावाचा उच्चार कसा चुकीचा असेल? आग लागो त्या फिरंग्यांच्या बोबड्या उच्चारांना. पण त्यांनी आधुनिक विज्ञान आणले म्हणून त्यांना माफ केले. आहे की नाही मी न्यायचतुर रामशास्त्री? अजून एक विषयांतर करून गंमत. माझे मावसे. त्यांना सर्व नाना म्हणत. एक अशिक्षित महिला त्यांना नाणा म्हणते. न म्हटले तर उच्चारता येतो. म्हटले तर नाही. आहे उत्तर?

दुपारपर्यंत मुन्णारचा घाट आला. पाच एक कि. मी. गेल्यावर समोरून एक गाडी आली. म्हणजे तशा येतच होत्या पण ही विशेष होती. दिल्लीचा नंबर होता. भर दुपारी हेडलाईट लावलेले. कॅरिअरवर पिवळे फॉगलाईट पण चालू होते. वा. दिल्लीची पद्धत दिसते. टळटळीत उन्हात फॉगलाईट. दिल्लीकरांची मनसोक्त टिंगल केली. पाचहि जणांचे एकमत. साले मुंबईवर अन्याय करतात काय? मज्जा आली.

जराशाने आणखी एकदोन गाड्या गेल्या. केरळातील नंबर. हेडलाईट चालू. आता मात्र आमची तोंडे पाहाण्यासारखी झाली. पण पाचहि जण मूर्ख होतो म्हणून बरे. तेरीभी चूप, मेरीभी चूपच. एकच असता तर त्याची खैर नव्हती. आणखी पाच एक कि. मी. गेलो. आणि काय. हवेने टोपी फिरवली होती. आणि आमची उडवली. पण वेगळ्या तर्‍हेने. ’गारवा’ मध्ये ऋतू ’कूस’ बदलतो तशी. (’गारवा’ नंतर आली. तेव्हा नव्हती) घनदाट ढग उतरलेले आणि पाऊस. दहापंधरा फुटावरचे पण दिसत नव्हते. आम्ही आता डोंगराच्या विरूद्ध बाजूस आलो होतो. दिल्लीवाल्याने उगीच नाही फॉगलाईट लावले होते. आम्ही ध्यानींमनीं नसतांना अचानक स्वप्नसृष्टीत प्रवेश केला होता. मुन्नारचे पहिलेच दर्शन जोरदार झाले होते. सकाळच्या उकाड्यानंतर त्याचे मोल काय आहे ते सांगून कळणार नाही. वाटले, आताच जून महिना लागलाय आणि पहिल्या पावसातून कॉलेजच्या पहिल्या दिवशी लेक्चरला चाललो आहे असे वाटायला लागले. रुपारेलच्या सुंदर कॅंपसमधील ते रंगीबेरंगी दिवस डोळ्यांसमोर आले.

नंतर ढग वरती गेले पण पाऊस मुसळधार झाला. वेग १५-२० कि.मी. वर आला. रस्ता अगदी खराब. समोरील वाहने अंगावर येताहेत असे वाटत होते. पण एक होते. येथील ड्रायव्हिंग तेल्लीचेरीसारखे ’खास’ नव्हते. तरी आमच्या सारथ्यांच्या कौशल्याला सलाम. मी आयुष्यात असे सारथ्य करू शकणार नाही. रौद्र निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर हवेतील कठीण प्रवासाचा थरार काही वेगळाच असतो. याचसाठी केला होता अट्टाहास. पण हे कौशल्य नसेल तर हा रोमांचकारी थरार क्षणांत मातीमोल होण्याची शक्यता असते.

असो. अखेर दीड एक तासांच्या खडतर प्रवासानंतर मुन्णार आले. सुदैवाने पाऊस कमी झाला होता. हॉटेलशोधन सुरू. मुन्णारचा कोपरा कोपरा धुंडाळला सगळी हॉटेले भरली होती. जगातील सगळे लोक मुन्णारलाच आले होते की काय? एक ’हॉटेल एस एन’ म्हणून आहे. बर्‍यापैकी स्वागत कक्ष. तेथील मॅनेजर कम मालक गृहस्थ छान हिंदी बोलत होते. साठीच्या आतबाहेरील असावेत. पूरा हॉटेल फुल्ल है. दो दिन जगह नही मिलेगी. त्यांनी आमची गाडी रस्त्याने जातांना पाहिली होती.
आपका नंबर बंबईका है?
जी हॉं. मी.
मैं बम्बई मे रहता था. अब्ब रिटायर हुआ. आई ऍम सिक्स्टी फाइव्ह नाऽव. वयाच्या मानाने खरेच तरूण दिसत होते. कितने लोग है? फॅमिली है की सब्ब जेंटस?
सब जेंट्स. पांच.
तो एक काम कर सकता हूं. आप बाकी होटल मे देखो. अगर किधर जग्गा नही मिलती है, तो मै आपको एक रूम दे सकता हूं. एकदम सिंपल है. एकही टॉईलेट है. इंडियन टोईलेट. पेंटिंग बाकी है. लेकिन क्लीन है. अगर आपको पसंत हो, तो.
म्हटले रूम तर पाहू. चाळीतील खोली असावी तशी एकच लांबलचक कळकट अंधारी खोली होती. दरवाजाच्या समोरच्या टोकाला एकच बाथरूम कम इंडियन टॉयलेट होते. उजव्या हाताला पांच कॉट्स रांगेने मांडल्या होत्या. गाद्या अभ्रे मात्र शुभ्र व स्वच्छ होते. बाकी हॉटेले हिंडलो होतोच. पावसाचा जोर पण वाढला होता. परत फिरून पुन्हा खाली उकाड्यात जाण्यापेक्षा हे काय वाईट होते? जाड्याला घासाघीस करायला त्याच्यावर सोडले. सोळाशे सांगितलेल्या रूमचे त्याने ती फार उदास व काळोखी आहे म्हणून किंमत कमी करून पाहिजे करत त्यांना पीळ पीळ पिळून हजार रुपयात पटवली. शेटजींच्या चेहऱ्यावरील हास्य रुंदावले.मस्त थंडगार हवा. आंघोळ करण्याआधी संध्याकाळपर्यंत पावसातच भिजत फिरण्याचे ठरले. शेटजी व मी छत्री घेऊन. शेटजींकडे कंडक्टरची धोपटी होती व माझ्याकडे विकत आणावयाचे सामान येणार होते. जोरदार पाऊस होता. वारा बेताचाच होता म्हणून नशीब. तरी खांदे व रिकामे डोके एवढाच ऐवज पूर्ण भिजला नाही. अर्ध्या पॅंटचे महत्त्व अशा वेळी कळते. पावसामुळे सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेता येत नव्हता. चारपाच फुटावरीलहि काऽऽही दिसत नव्हते. थोडेसे फिरून परतलो. आता माहेला अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी घेऊन ठेवलेली बकार्डी खुणावायला लागली. शेटजींनी एका दुकानात सुरेख दिसतात म्हणून वेफर्स घेतले होते. टॅपिओकाचे वेफर्स. चमकदार असे, दुधाच्या फेसाप्रमाणे पांढर्‍या शुभ्र रंगाचे. एवढे सुंदर दिसणारे वेफर्स आम्ही कोणीहि तोपर्यंत पाहिले नव्हते. पण धोरणीपणा दाखवून आम्ही तसे बोलून दाखविले नाही. निदान चार ग्रेट मेन थॉट अलाईक. थंडीत भिजून हुडहुडी भरल्यावर. त्या कळकट खोलीत बकार्डीला न्याय मिळणार नाही तसेच रूमवर खाद्यपदार्थ आणल्यास घाण होणारच. जसे गाडीत खाऊ नये तसेच रूमवरहि खाऊ नये. म्हणून त्या हिंदी बोलणार्‍या सद्गृहस्थांना जरा ’चांगली’ ’सोय’ करण्यास सांगितले. तेथे त्यांनी एका मोठ्या रूमचे तात्पुरते डायनिंग रूममध्ये परिवर्तन केलेले होतेच. सुरेख सोय केली. कॉर्किंग चार्जेसहि लावले नाहीत. पण एक अविस्मरणीय स्टोरी मिळाली. ते सुरेख आकर्षक दिसणारे वेफर्स. हाय रे दुर्दैवा. चामड्यासारखे चिवट होते. एकच खाईपर्यंत जबडा मोडून जाईल. चामडे, च्युईंग गम आणि बहुधा पोलादाने बनविलेले असावेत. नार्‍याच्या बैलालाऽऽ ............. आम्हाला आता जास्त चवदार खाद्य मिळाले. कायमचे. अजूनहि आम्ही त्याला आंऊ आंऊ करून तोंड वाकडे करून चिडवून दाखवतो व मुन्णारचे वेफर्स एवढेच उच्चारतो. अथातो मुन्नारस्या वेफरकथा. जाड्याची पाण्याची बाटली आणि ते वेफर्स या दोन गोष्टी त्यांना मरेपर्यंत पुरतील. केरळी लोकांना चवीचे एवढे वावडे कां कळत नाही. रात्री पाऊस वाढला. जेवणानंतर फिरण्याची काहीच सोय राहिली नाही. उद्या काय करायचे. दोन रात्री राहण्याचा बेत होता. जर उद्या मुन्णार पाहता आले तर राहू. नाहीतर प्लान बदलू. वाट फुटेल तिथे जायचे आहे. मग त्या उकाड्यातून छोट्या गाडीत पाच जण? चार असतो तर गोष्ट वेगळी. कन्याकुमारी कॅन्सल. कोडाईला जाऊ. दोन रात्री राहू. कारण रस्ता घाटाचा. आणि वाईटच असणार. गाडी चालवतांना फार त्रास होणार. तेथून टेकडी (लिहितात ’थेक्कडी’ असे. केरळ्यांच्या बैलालाऽऽ ...) जरूर पडली तर एखादी रात्र राहू. तेथून कोट्टायम. कोट्टायमपासून बॅकवॉटर्स फक्त १४ कि.मी. आहे. मास्तरांनी माहिती पुरविली. नकाशातहि तसेच दिसत होते. दिवसभर बॅकवॉटर्सला फिरू. संध्याकाळी पुन्हा कोट्टायम. नंतर मुंबईकडे प्रवास सुरू करू. वाटेत एर्नाकुलम. म्हणजे कोचीन. तेथे चायनीज फिशिंग नेट्स पाहू. असेल तर आणखी एखादे ठिकाण. मग परतीचा प्रवास मजल दरमजल करीत पुणे. व देवाची गाडी घेऊन परत मुंबई. ठरले. आम्ही मद्याच्या आहारी जात नाही. इतरांना उपद्रव करीत नाही. स्वत: आनंद लुटतो व थोडे जास्त खिदळतो. बकार्डीला न्याय देता देता हे प्लानिंग केले. असो. नंतर गुढगे टेकण्याचा समारंभ.झोपलो.

०६ऑक्टोबर २०००.
सकाळी साडेपाच सहालाच किचनमधून किणकिणाट ऐकू आला. अहाहा. त्या क्षणी जगात यापेक्षा चांगले संगीत असूच शकत नाही. चहा घेतला. आकाश ढगाळच होते. पण नम्तर मात्र थोड्याच वेळात लख्ख ऊन पडले. उत्साहवर्धक हवा. त्या छान वातावरणातून पाय निघेना. देवाने हॅंडिकॅम काढला. वेड्यासारखा कॅम घेऊन फिरत होता. एका बाजूला ’सरवान’ हॉटेल होते. (सरवान आणि आर्य ही तमिळनाडूमधील सुप्रसिद्ध चेन हॉटेल्स आहेत. हे दोन्ही केरळी नसल्यामुळे दोन्हीतील पदार्थ चवदार व विशिष्ट चांगल्या सातत्यपूर्ण दर्जाचे असतात.) तत्परतेने पोटभर खाऊन घेतले. ’सरवान’मध्ये तीन वेगवेगळ्या चटण्या असतात. हिरव्या मिरचीची कोथिंबीर घातलेली तिखट चटणी, चिंचेची चटणी व आपल्याकडे न मिळणारी टोमॅटोची चटणी. हव्या तेवढ्या. नाहीतरी इडलीला स्वत:ची अशी खास वेगळी जी चव असते ती चटण्यासांबारानेच जास्त खुलते. लवकरात लौकर निघून पर्यायी प्लान अंमलात आणायचे ठरले.

पण या हॉटेल एस एन ने आम्हाला एक रात्र चांगले छप्पर तर दिले. एस एन च्या मालक कम मॅनेजरशेठना चांगल्या सेवेसाठी धन्यवाद दिले त्यांनी नेक्स्ट टाईम इधर हमारे हॉटेलमेही जरूर आना म्हणून धन्यवाद दिले. २००४ साली आम्ही पुन्हा त्याच हॉटेलात उतरलो. आणि त्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. असो. कोडाईकडे कूच केले.

संपूर्ण रस्ता डोंगरातील घाटाचा व वळणावळणांचा. आम्ही मागील प्रवासी मजेत होतो. पण रस्त्याने सारथ्यांची चांगलीच कसोटी पाहिली. एक घाट संपनो न संपतो तोंच दुसरा सुरु. असे वाटायला लागले की या रस्त्याला शेवटच नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत असेच घाटातून वळणे घेत जावे लागणार. एकाबाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. घनदाट वनराई. संपूर्ण निर्मनुष्य. हा टापू तेव्हा भरात असलेल्या वीरप्पनचा होता.

तीन साडेतीन तासांनी एकदाचे एका पठारावर आलो. २५ ३० कि. मी. गेल्यावर एके ठिकाणी रस्त्याच्या समोरच्या कडेला एक टपरी दिसली. चहा घेऊन ताजेतवाने व्हावे म्हणून थांबलो. आता अरण्य संपले होते. पण झाडोरा बर्‍यापैकी होता. असे वाटले की दक्षिण कोंकणातच आहोंत. उतरल्यावर जाणवले की हवा गरम होती. चहा घ्यावा की न घ्यावा या विचारात चारहि जण पडलो. जाड्या सकाळी एकदाच चहा घेतो. मी टपरीवर गेलो. टपरी ही एक झोपडीच होती. आतूनबाहेरून शेणाने सारवलेल्या भिंती. वर झावळ्यांचे व पेंढ्याचे छप्पर. रस्त्याकडे खिडकी होती. डाव्या बाजूने दरवाजा होता. रस्त्याच्या विरूद्ध बाजूला आणखी एक खिडकी होती. तेथे फक्त जेवण मिळत होते. काय काय आहे ते पाहिले. साधा भात, पोंगलभात, सांबार, दोन भाज्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताकाची कढी होती. स्वच्छ चकचकीत स्टीलच्या बादलीत ठेवलेली. एकदम पातळशी कढी, भरपूर कोथिंबीर तरंगत असलेली. फोडणीचा खमंग दरवळ. पदार्थ केळीच्या पानावर वाढले जात होते. टेबले अस्सल ग्रामीण. न रंधवलेल्या ओबडधोबड फळ्या खिळ्याने ठोकून बनविलेली. समोरच्या खिडकी पलीकडे ग्रामीण डस्ट बिन कम वॉश बेसिन होते. लोक त्यांत हातहि धूत होते व खाऊन झाल्यावर स्वत:च केळीचे पान त्यातच नेऊन टाकत होते. फोडणीचा दरवळ मला दूर ठेवू शकला नाही. पण आता तमिळ भाषेशी गांठ होती. मी बोलण्याचा शहाणपणा केला नाही. तेथील विक्रेत्याला स्टीलचा ग्लास दाखवला व ’एक’ या अर्थी तर्जनी एक क्षण उभी धरली आणि लगेच कढीची बादली दाखवली. त्याने लगेच एक ग्लास भरून कढी दिली. करपल्लवी झिंदाबाद. कढीच्या चवीने निराशा केली नाही. थंडगार कढी त्या रणरणत्या उन्हात सुरेखच होती. मला कांहीतरी चांगले सरबत गवसल्याचे बाकीच्यांनी ताडले व सगळे उतरून रस्ता ओलांडून आले. त्यांना वाटले सरबताचा स्टॉल आहे. पण जेवण पाहून त्यांना गंमत वाटली. सगळेजण दोनतीन ग्लास कढी प्यायले. जाड्याने तेवढ्यात प्रवासाला निघाल्यानंतर प्रथमच पाहिलेला पोंगलभात खाऊन पाहिला. आम्ही पण एकेक घास घेऊन चव पाहिली. खरोखरच उत्कृष्ट चव होती.

चवीच्या बाबतीत तमिळनाडु केरळच्या विरूद्ध टोकाला आहे. कोणत्याहि टपरीत जा व इडली, (मेदू)वडा, डोसा वगैरे छान व गरमागरम असते. सांबार व दोनतीन चटण्या भरपूर व हव्या तेवढ्या आणि चविष्ट असतात. ताजेतवाने होऊन निघालो. लगेच पुढला घाट लागला. तीनचारच्या सुमारास कोडाईला पोहोचलो. सुरेखच हवा. किंचित उतरत्या दुपारी पोहोचूनहि घामाचा टिपूसहि नव्हता. २०-२२ च्या आसपास तपमान असावे. हॉटेलात जागा नव्हत्या. जेथे होत्या ती पसंत आली नाहींत. वर फार महाग होती. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे गाईड, हॉटेलांचे एजंट वगैरे त्वरित आपल्या भोवती गोळा होतात. एका एजंटला आम्हाला हॉटेल कसे स्वस्त आणि मस्त तसेच सुरक्षित पार्किंग असलेले पाहिजे ते इंग्रजीतून समजावले. पार शहराच्या टोकाशी असलेले एक हॉटेल त्याने दाखविले. ठीक होते. जरा दूर म्हणजे हिलस्टेशनात असतो त्या मध्यवर्ती बाजारापासून दोनटीन कि. मी. दूर होते. चला. तेवढेच चालणे होईल. पण एकच प्रश्न होता. बाजूलाच मशीद होती. मशिदीला कर्णे होते. हॉटेल डोंगर‍उतारावर होते. आम्ही बेसमेंटमधील खोल्या घेतल्या. खिडक्या दरीत उघडत होत्या. याचे नाव हॉटेल मधुचंद्र असायला हरकत नव्हती. छताला भलेमोठे आरसे होते. पण दर फारच माफक होते. जाड्याने ते रु. ३५०.०० पर्यंत उतरवले. त्याला पदक द्यायला हरकत नाही. चेक इन करतांना आम्ही मराठीतून पण गुप्तभाषेत वाह्यात गोष्टी करत होतो. आणि ते मॅनेजरसाहेब म्हणाले, "अहो साहेब मला मराठी कळते. मी तमिळ मुस्लिम आहे खरा पण मी नांदेडला दहाबारा वर्षे होतो." नंतर दोन दिवस ते आमच्याशी स्वच्छ मराठीतच बोलत होते. आजकाल पर्यटकात मराठी लोक जास्त असतात. म्हणून पर्यटनव्यवसायात इंग्रजी हिंदीखालोखाल मराठी येणाऱ्यांना प्राधान्य मिळते. काय बरे वाटले की नाही ऐकून? यांनी पण चांगली सेवा दिली.

मग सामान उतरवून फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो. येथे रस्त्यावर ठिकठिकाणी उकडलेले शेंगदाणे मिळतात. नुसते उकडलेले, मसालामिश्रित किंवा मसाला व बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घतलेले उकडलेले शेंगदाणे. तसेच निलगिरी तेलाच्या बाटल्या, हाती बनविलेली चॉकलेटे, कॉफी बिया तसेच साऊथ इंडिअन, चिकॉरी मिश्रित वगैरे विविध प्रकारची कॉफी पूड, मी एक आठवण म्हणून निलगिरीची बाटली घेतली. ती अजूनपर्यंत होती. आमचा मुलगा सर्दी झाल्यावर ते रुमालालावून वास घेत असे. ते संपल्यानंतर मात्र त्याने दुसरे आणले नाही. कच्चे व पिकलेले तोतापुरी आंबे होते. कच्चे आंबे कापून मीठमसाला लावून रस्त्यावर मिळतात. ते पाहून शाळेतील दिवसांची आठवण झाली. हे बारा महिने मिळतात म्हणे. दुसरे दिवशी फ़िरायला गाडी व गाईड ठरवला. या वेळी मारूती व्हॅन मिळाली.
क्रमश:

वाट फुटेल तिथे - ४

PRAVAASSUDHIRSANGE
Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ४
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी
४ ऑक्टोबर २०००.मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसांचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. खरेच मन उमदे असेल तर आपले व्यक्तिमत्त्व कोणत्याहि कामांत उतरते व त्या पदावर आपला ठसा उमटतो. मॅसा मुळे त्या सरकारी पदाची शोभा वाढली हे निस्संशय. सातसाडेसातला निघालो.

आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाजूच्या दोघापेक्षा मी नशीबवान होतो. मला संपूर्ण दृश्य दिसत होते.मास्तरांनी विशिष्ट पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया दाखविल्या. चहाच्या मळ्यावरील कामकरी स्त्रिया. ‘कूर्ग जिल्ह्यातील चहाच्या मळ्यातील काम करणारी स्त्री’ अशा मथळ्याचे चित्र शाळेत असतांना भूगोलाच्या पुस्तकात होते ते मास्तराला त्वरित आठवले आम्हा इतरांना नंतर आठवले, फेटेधारी नसतांना देखील. परंतु त्याला त्वरित आठवले.


घाट चढतांना अप्रतिम सेट डोसा मिळाला. उतरतांना कां मिळू नये! वाटेत एक टुमदार गांव लागले. आठवड्याचा बाजार भरला होता. सुरेख हवेमुळे पोटातील कावळ्यांना कंठ फुटला. क्षुधा शांति भवन शोधूं लागलो. एके ठिकाणी पार्किंग मिळाले. हॉटेल काही दिसेना. करपल्लवीचा आधार घेतला. एकाने हॉटेल दाखविले. बेत काही खास नव्हता. काय खाल्ले आता आठवत नाही. निघालो. घाट उतरणे पुढे सुरु.

गाडीच्या चाकांची रस्त्याशी तीव्र उतारावर जी झटापट चालू होती त्या गडबडीत माझी बॅग माझ्या मानेवर यायला लागली. माझ्या मानेवर एक जूं आले असून ते अगदी योग्य आहे, किंबहुना ते येण्यास फार उशीर झाला आहे, नव्हे ते जन्मत:च असायला हवे होते यावर इतर चौघांचे एकमत झले. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक.

मी पुन्हा मागे तोंड करून गुढगे सीटवर ठेवून माझी बॅग त्याखालील बॅगवर दोरीने बांधायला लागलो. गाडीच्या मागच्या काचेतून नजर टाकली. विश्वास बसेना एवढे सुंदर दृश्य. घनदाट अरण्य म्हणजे काय? फक्त ब्रिज इन रिव्हर क्वाय सारख्या सिनेमात पाहिले होते. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनातीत सुन्दर. मी शब्दप्रभू नाही याचे दु:ख होते. ते वर्णन करण्यासाठी कवीलाच तेथे उतरावे लागेल. ते अरण्याचे दृश्य मनावर कोरलेले आहे.
केरळ्च्या सीमेत प्रवेश केल्यावर एक फरक जाणवला. सीमेवरच्या गावातील बाजारालगतच रस्ता जातो. माणसांची प्रचंड गर्दी. आणि गावाला लागून गावे. निर्मनुष्य प्रदेशच नाही. पुढील ठिकाण होते मुन्नार. त्या रस्त्यावर आमच्या नकाशात केरळ्मधील थल्लीसेरी हे गाव दिसत होते. इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे. डावीकडे पुढे देवा व मागे जाड्या होते. साहाजिकच रस्ता विचारण्याची जबाबदारी त्या दोघांची. थल्लीसेरी कोठे आहे कोणालाच माहिती दिसेना. तुमचे मुखचंद्र पाहून लोकांना पत्ता सांगावासा वाटत नाही किंवा ते तो विसरत तरी असावेत. आमची मल्लिनाथी. पण टिंगल आणि आचरट विनोद हा पर्याय नव्हे. वेग २० - २५ वर आला. "अरे तेच तेल्लीचेरी असणार." मास्तरांना साक्षात्कार झाला. आणि कपडे घालून युरेका. त्वरित प्रतिसाद मिळाला. (टंकतांना चुकून प्रीतिसाद टाईप केले होते. नवीन शब्द मिळाला. शिंप्याची चूक हीच फॅशन होय, या थाटात.)

पावसाची रिपरिप चालू झाली. इथे मान्सून अद्याप कार्यरत होता. हवा मुंबईपेक्षा गरम. आता आगेकूच सुरु झाली. केरळमधील कुशल सारथी चांगलेच हात दाखवू लागले. मोठ्ठ्या बसेस (अनेकवचन बशी करावे का?) आपल्या गाडीच्या मागे चिकटून जोराजोरात पांचजन्य करून बाजूला होण्यास सांगतात (साईड मागतात). डावीकडे जाऊन रस्ता दिला की अति जवळून अति वेगात पुढे जातात. सहाइंचाचे अंतर जरी ठेवले तरी शिक्षा असावी. रॅश हा शब्द लाजेल असे ड्रायव्हिंग. आणि जरा पुढे जाऊन एकदोन किलोमीटरवर थांबतात. कारण त्यांचा थांबा असतो. पुन्हा आपण पुढे जायचे. सुटलो म्हणून श्वास घ्यावा तो पुन्हा मागून पांचजन्य. अशा लडिवाळ रहदारीतून अखेर तेल्लीचेरी आले. तेल्लीचेरी शहरातील रहदारी कशी? तर मुंबईत दुपारी दवाबाजारात असते तशी. चिंचोळ्या गल्ल्या आणि मोठ्या वाहनांची बेशिस्त अशी प्रचंड गर्दी. नियम पाळल्यास मृत्युदंड असावा. ही केरळ स्पेशल रहदारी बरे का. मुंबई पुण्यात राहून याची कल्पना येणार नाही. तेल्लीचेरीला लागूनच ‘माहे’ हा केंद्रशासित प्रदेश (युनिअन टेरिटरी) आहे. तेल्लीचेरी कोठे संपते व माहे कोठे सुरू होते हे दुकानावरूनच कळते. तसा वाटेत एक छोट्या गावातील जकातनाक्यासारखा जकात नाका आहे. पण त्याने आम्हाला थांबविले नाही. एका शहराचेच दोन भाग. दुसरे काय! "युनिअन टेरिटरी ऑफ़ माहे ऍंड पॉण्डिचेरी" माहे कुठे पॉण्डिचेरी कुठे. सरकारी विनोद. आणखी काय! गंमत म्हणजे पॉण्डिचेरीचे स्पेलिंग तेल्लीचेरी सारखे नाही. समाजवादाचा अभाव बरे. एवढा पंक्तिप्रपंच बरा नव्हे. कोण म्हणतो केरळमध्ये साम्यवाद्यांचा जोर आहे? आणखी एक गंमत. मुंबईच्या दवा बाजारात जेवढी औषधाची दुकाने नसतील त्यापेक्षा जास्त येथे दारूची आहेत. थोडक्यात म्हणजे मद्यप्रेमीचे तीर्थक्षेत्र. खरे म्हणजे एका सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धर्मपीठाचेच नाव जिभेवर आलेले आहो. कोणते ते चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. कुतूहल म्हणून उतरून दर पाहिले. ७५० मि ली रम रू १२८, ७५० मि ली बकार्डी रू ४५० रेव्हिएरा वाईन रू ६५० त्या वेळी यांचा मुंबईतील किंमती अनुक्रमे रू. २००, ८५० व १२०० होत्या. हे राज्य सगळीकडून केरळने वेढले आहे. पश्चिमेला समुद्रकिनारा असावा. मग वेगळ्या राज्याचे प्रयोजन काय. सरकारच जाणे. मद्यप्रेमींची चांगलीच सोय. केरळमधून ५० कि मी पर्यंत पासूनचे लोक येतात मद्यप्राशनाचा आनंद लुटतात व घरी (किंवा गटारात) जातात. जवळजवळ सर्व दुकानात पिण्यासाठी कक्ष देखील केलेले आहेत. श्रेष्ठ तळीरामांना राज्य सरकार तर्फ़े पुरस्कार दिले जातात की काय ठाऊक नाही. असल्यास माझा सलाम. नसल्यास कठोर निषेध. अथातो मद्यजिज्ञासा.या जिज्ञासेत अर्धा तास खर्च केला. निघालो.

नकाशातल्या मार्गावरील पुढील ठिकाण होतेकालिकत. ’वॉस्को द गामा १४९८ साली कालिकत येथे आला’ हे वाक्य आपण सर्वांनी शाळेत असतांना इतिहासात वाचले असेलच. या ठिकाणाबाबत एक गंमत आहे. मी जेथे काम करतो (दुर्दैवाने पोटासाठी करावे लागते) तेथील डिस्पॅच खाते एकदा एकाच्या गैरहजेरीत मी सांभाळले होते. परचेस ऑर्डर पाहून माल कालिकतला पाठविला. बिलांच्या मूळ प्रती बॅंकेत पाठवायच्या वेळी त्यांच्या कार्यालयाचा व कारखान्याचा पत्ता वाचतो तर काय, कोझीकोडे. मी टरकलो. माझे थोबाड पाहून सुमति नामक स्टेनो पण टरकली. वॉट्ट हॅप्पण्ड? तिने विचारले. मी म्हटले ऑर्डर ऑफ़ रामेश्वर, गुड्स सेंट टू सोमेश्वर. कंप्लीट डिसऑर्डर ऑफ़ पर्चेस ऑर्डर. कालिकत का माल कोझीकोडे भेजा. ती बया हसायला लागली. ती केरळीच होती. बोथ्थ आर दी सेम. टू नेम्स ऑफ्फ वन्न प्लेस. माझा जीव कालिकतच्या भांड्यात. असो.

एका मैलाच्या दगडावर चक्क हिंदी पाटी दिसली. ’कोषिकोडे ---- किमी’ अशी. मिसळपाव डॉट कॉमचे सभासद आणि लेखक वाचक श्री. अनिकेत यांनी कोळिकोडे असे या शहराचे तिसरे नाव कळविले आहे. धन्य ते केरळी उच्चार. हे लोक जर आमच्या शाळेत शिकले असते तर झेब्र्यासारखे दिसले असते. शिक्षकांच्या छड्या खाऊन. पुढील विचित्र नावे मात्र इंग्रजी दगडावर बरोबर लिहिली होती. पोन्नान्नी, गुरुवायूर, इरिंजळकुड्डा. तरी चवक्कल कांही ठिकाणी चव्वक्कड केले होते. पण फारशी गफलत नव्हती.

मुन्नारला संध्याकाळपर्यंत पोचणे शक्य नव्हते. अंतर फार. वाटेत कोठेतरी मुक्काम करावाच लागणार. तर जरासा वळसा घेऊन कालडी का पाहू नये. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान. आम्ही जरी धार्मिक नसलो तरी एका लोकोत्तर पुरुषाच्या जन्मस्थानी जायला काय हरकत आहे? हजार अकराशे वर्षापूर्वी दळणवळणाची साधने काय होती असावीत? घोडा, बैलगाडी आणि घोडागाडी. आणि अर्थात गांधीविनोबांची अकरा नंबरची बस. या महापुरुषाने त्या काळी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानचा दौरा करून वादविवादात इतर धर्मांच्या तत्कालीन पंडितांना खासकरून बौद्ध धर्मीय; जिंकून हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन केले. अफाट विद्वत्ता आणि जीवनाचे एवढे प्रचंड ध्येय समोर ठेऊन ते चिकाटीने पूर्ण करणे हे अलौकिकच होय. अशा विद्वान आणि थोर व्यक्तीला वंदन करून आमचा स्वाभिमान काय कोसळणार की बुडणार होता? कालडीवरून जायचे एकमताने ठरले.

धार्मिक असलेले शेटजी खूष झाले. गुरूवायूर मात्र टाळले. तेथील मंदिर फार सुंदर आहे असे आम्हाला वाटेत कोणीतरी पत्ता सांगणाऱ्याने सांगितले. त्रिचूर (वा त्रिशूर) मार्गे कालडी. येथे थांबलो.सुबक प्रवेशद्वार. आत कॅमेरा नेता येत नाही. तो प्रवेशाशी जमा करावा लागतो. पावती न घेता. प्रकाशचित्रे येथून निघतांना प्रवेशापाशी काढली. हे केंद्र आतून पाहतांना मला वरळीच्या नेहरू सेंटरची आठवण झाली. गोल इमारत. बाहेरील भिंतीला लागून आतील बाजूने जिना. दोनतीन फ़ूट लांबीच्या पायर्‍या. दर पांचसहा पायर्‍यानंतर मजले किंवा कोनाडे केले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील प्रसंगावरील व दंतकथांवरील देखावे आहेत. त्याबद्दल मी कांही लिहीत नाहीं. ते तेथेच जाऊन पाहावे.

संध्याकाळपर्यंत कोचीनपर्यंत पोहोचू असे वाटले होते. पण वाटेतच संध्याकाळ होऊ लागली. पावणेसहाच्यासुमारास इडप्पल नावाच्या छोट्या शहरसदृश गावात आलो. इडप्पल गावामधूनच रा.म.मा. १७ जातो. चांगले सोडाच, बरेसे देखील हॉटेल दिसेना. अखेर एका शॉपिंग सेंटरमध्ये हॉटेल बॉम्बे ची पाटी दिसली. जाऊन पाहिले. तीन खोल्यांचा बर्‍यापैकी सूईट होता. प्रशस्त लिव्हिंग रूम, प्रशस्त बेडरूम व अलीशान वेटिंग. भाडे रु. ३५०.०० फक्त. आश्चर्य वाटले. टॉवेल, साबण कांही नाही. गरम पाण्याची सोय नाही. हवा तर मुंबईपेक्षा जास्त उकाड्याची. चला, टेकायला स्वच्छ आणि चांगली जागा तर मिळाली. ती देखील स्वस्तात. आंघोळी करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. हे जे हॉटेल होते ते हॉटेल नव्हतेच. ते एक सभागृह वजा लग्नाचा हॉल होता. हॉल अगदी थेट पुण्यामुंबईच्या सिनेमा हॉलसारखा. लग्न गृह असल्यामुळे हॉलला लागून दोन सुईट होते. एक वरपक्षासाठी व दुसरा वधूपक्षासाठी. जेव्हा लग्न नसे तेव्हा हे सुईट ते  ’बॉंबे हॉटेल’ होत असत. छोटे गांव म्हणून स्वस्त. काय कल्पकता आहे. मुख्य म्हणजे गाड्या ठेवायला प्रशस्त तळघर होते. सुरक्षा असलेले.

मग फिरतांना जेऊनच हॉटेलात परतण्याचे ठरले. येथे पाहण्यासारखे काहीच नव्हते. जेवण्यासाठी हॉटेल शोधून ठेवत होतोच. ख्रिस्ती बंधूंची काही हॉटेले होती. दर मुंबईपेक्षा किंचित कमी. म्हणजे तसे महागच. चिकन मटन मसाला रू. ७५.०० प्लेट च्या आसपास. बीफ़ रू. २५.०० फक्त. ईडली, डोसा कोठेच नव्हते. मल्याळमखेरीज दुसरी भाषा कोणाला येत नाही. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. समोरच्या पदपथावर थोडे पुढे ते हॉटेल आहे असे त्याने खाणाखुणा करून सांगितले. एक गोल गरगरीत पण अतिशय आनंदी चेहर्‍याचा मालक गल्ल्यावर बसला होता. फक्त गुडुगुडू. काय बोलतो कळेना. आम्ही बोलतो ते त्याला गुडुगुडु. त्याने एकाला हाक मारली. एक वेटर आला. त्याला मोडतोड हिंदी बोलता येत होते. शाकाहारी जेवायचे म्हटल्यावर आत एक वातानुकूलित कक्ष होता तेथे नेले. थंड चिवट चपाती आणि सपक अळणी भाजी मिळाली. खोबरेलात बनवलेली भाजी. कसेबसे ढकलले. इडली डोसे फक्त सकाळी. इतर लोक थंड उकडा भात व थंड रस्सा खातांना दिसले. पण त्याचे रंगरूप पाहून ते न खाण्याचे ठरविले. पदार्थ चवदार नाही तर निदान गरम तरी बरा लागतो हेहि या थोर लोकांना ठाऊक नसावे. चवीचे तर वावडेच असावे. प्यायला उकळते गरम पाणी. चहाच्या काढ्याच्या रंगाचे. त्यात कसलीशी पाने असतात. ते मात्र पिऊन पाहिले. बहुधा सर्वात चवदार पदार्थ हाच असावा. हे बहुधा त्या हवामानाला उपकारक असावे. गरम असून याने तहान भागते हे खरेच. थंड फराळ (थंडा नव्हे) व गरम पाणी हा संगम अनोखाच. दुसरे दिवशी सकाळी गरमागरम इडली व डोसा मिळणार. साडेआठला हॉटेल उघडल्यावर. चला, हेहि नसे थोडके. आता रात्री अर्धपोटी असल्यामुळे सकाळी येथेच न्याहारी करून निघण्याचे ठरले.

खास काही घडले नाही, सामान्य गोष्टीच आम्हाला वेगळ्या अनुभवामुळे व उत्तेजित प्रसन्न मनस्थितीमुळे खास वाटल्या.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav।com 09 Mar। 2008

वाट फुटेल तिथे - ३

मडिकेरी : दोन सेनापतींचे सुंदर गांव

३ ऑक्टोबर २०००.
सुरेख हवेमुळे पोटातील कावळे जागे झाले. त्यामुळे जेवण पूर्ण स्किप न करता पोटात हलके पदार्थ स्किप करुन सोडावेत असे ठरवले. वाटेत एक छोटेसे गांव लागले. खाण्याची टपरी कुठे दिसते काय हे पाहू लागलो. चौकशी करु लागलो. हिंदी इंग्रजी कुणाला कळेना. जेवण्याची खूण करुन इडली डोसा हे शब्द उच्चारु लागलो. एक चौकात पार्किंगला चांगली जागा दिसली. जवळील दुकानदाराला गाडीवर लक्ष ठेवायला विनंति केली. अर्थात खुणेने. उतरुन आरोग्य भवनाचा शोध घेतला. अखेर एक किशोरवयीन मुलाने एका छोट्याशा गल्लीत नेले. एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत एक छोटेसे शंकर विलास छाप हॉटेल दाखवले. बसलो. साठीच्या आसपास दिसणारी एक महिला आतून बाहेर आली. तिनें कन्नडमध्ये काहीतरी विचारले. माझ्या डोक्यात कांहीच शिरले नाही. मीं हिंदीत बोललो. तिथे अंधारच. मी कोकणीतून विचारले 'खावच्याक कित मॅळतले' म्हणून. (गोव्यातील कोकणीत खावपाक म्हणतात) पुन्हा अंधारच. माझ्या कोकणी भाषेच्या अज्ञानाची व कोकणी बोलण्याच्या क्षमतेच्या यथेच्छ चिंध्या. हा (मी) गाढव आहे की नाही? जाड्याने विचारले. तिला बोध झाला नाही परंतु तिची करमणूक झाली. जाड्या म्हणतो ते बरोबर की नाही असे त्या देवाने तिला विचारले. अर्थातच अर्थ न कळता त्या धोरणी महिलेने ताबडतोब मान हलवून होय म्हटले. भरपूर हशा पिकला. पण असे घडले हे माझ्यासारखा सूज्ञ अजूनहि कबूल करीत नाही. मग इडली डोसा शब्द उच्चारले. तिने होय म्हटले. युरेका युरेका. जवळ जवळ अर्धा तास वाट पहावी लागली. चांगला ब्रेक मिळाल्यामुळे कृष्णराज व शल्यराज खूष होते. आतून मसाल्याचे वास येऊ लागले. आत कावळ्यांना नाकाची कुमक मिळाली. रगड्यावर चटणी वाटल्याचा आवाज आला. शेवटी चुर्रचुर्र आवाज येऊ लागला व क्लायमॅक्स़ जवळ आल्याची जाणीव झाली. अखेर ते सेट डोसा नावाचे गरमागरम पूर्णब्रह्म समोर आले. असा सुरेख सेट डोसा आजतागायत आम्ही खाल्ला नाही. चटणी सांबार हवे तेवढे. ती चव ते जंगलातील गावातले सुरेख हवेतील भारलेले वातावरण (माहोल) आमच्या सर्वांच्या मनांवर कायमचे कोरले आहे. उर्दू वाचन त्याहून सुरेख. सव्वाएक तासाने तृप्त होऊन त्या अन्नपूर्णेला दुवा देऊन निघालो.

सुब्रमण्यम चा फाटा गेला. चहाचे मळे दिसायला लागले. तोपर्यंत ते मी फ़क्त भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांत व फ़ोटोतच आणि अर्थातच हिंदी सिनेमात पाहिले होते. माझी उडी माथेरान, महाबळेश्वर, मालवण, गोवा, अहमदाबाद, कारवार, शिरसी व अजिंठा याच्यापुढे गेली नव्हती. पाचच्या सुमारास डोंगराच्या कुशीतील स्वप्नातील दृश्यासारखे मनोरम दिसणारे गाव दिसू लागले व सर्वजण हरखून गेलो. आधीच हिल स्टेशन. त्यातून डिस्ट्रिक्ट फ्लेस. त्यामुळे उर्दू वाचन फ़ार होते. डबल ऑक्युपन्सीला १२०० पासून २५०० पर्यंत . त्या मानाने सुविधा नाहीत. आम्ही कोठून आलो याची चौकशी आधी करीत. आम्ही मुंबईचे पाहून चढे दर सांगत. गाडीचा नंबर काही लपत नाही. एकदोन ठीक होती पण पार्किंग चांगले नव्हते. कर्नाटक टुरिझम अर्थात के टी डी सी मध्ये गेलो. छापील दर. रुम्स यथातथाच होत्या. पण पार्किंगची जागा प्रशस्त आणि सुरेख. मागील बाजूने दरीला लागून असलेले अत्यंत रमणीय ठिकाण. भरपूर रिकाम्या रूम्स. साहाजिकच निवडीला जास्त पर्याय उपलब्ध. एक आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. के टी डी सी चे मॅनेजरसाहेब छान मराठी बोलत होते. कालपर्यंत पाऊस अक्षरशः वेड्यासाखा कोसळत होता. सतत चार महिने मुसळधार पावसाने वेड लागायची पाळी आली होती. तुमच्यासारखी खुल्या दिलाने बोलणारी माणसे पाहून फ़ार आनंद झाला असे म्हणाले. त्यांनी दोन दिवस खरेच खाजगी कंपन्यांनी लाजावे आशी उत्तम सौजन्यपूर्ण सेवा पुरवली. अर्थातच याचे थोडेसे श्रेय जाड्याकडे व माझ्याकडे जाते. जाड्या हा एक चांगला मार्केटिंग मॅनेजर व मी चांगला पी आर ओ (जरी प्रशासकीय खात्याचा असलो तरी) आहे. साहजिकच आमच्या जिभेवर मधाची कोठारे आहेत. कृपया मधमाशांना आमचा पत्ता देऊ नका. पंचाईत होईल. आमच्या तीन वर्षानंतरच्या पुढील दोन सहलीत याचा चांगला अनुभव आला. जेवण आमच्याच कॅंटीनमध्ये करा. येथील जेवण उत्तम असते. असे जेवण येथे दुसरीकडे मिळणार नाही. येथील स्थानिक लोक बाहेर जेवायला म्हणून निघाले की येथेच येतात. मॅसा नी सांगितले. आम्ही त्यांच्या कर्तव्यतत्परतेची ताबडतोब वाखाणणी केली व तसेच करण्याचे ठरवले. मराठी बोलणार्‍या व्यक्तीने त्यातून सरकारी - एवढे सौजन्य व अगत्य दाखवावे हे आश्चर्यच.

या रम्य ठिकाणी दोन रात्र राहायचे असे अगोदरच ठरले होते. मास्तर व देवा यांचे हे प्लानिंग अफ़लातून असते. डोळे झाकून मम म्हणावे. ऐसपैस प्रशस्त खोल्या. मागील दरीच्या बाजूस बाल्कन्या. सुरेख. रुम्स आतून एम टी डी सी च्या रुम्सप्रमाणे कळकट. त्यामुळे शोभा अजून कमी होण्याचा प्रश्न नव्हता. ताबडतोब दोर्‍या लावल्या व कपडे धुण्याचे जाहीर केले. दोघेजण कपडे धुवून आंघोळी आटपेपर्यंत तिघांनी मस्त झोप काढली. कपडे धुवून आंघोळी करुन ताजेतवाने होऊन पायी फ़िरायला बाहेर पडलो. मॅसा नी येथील जेवण सर्वोत्कृष्ट आहे म्हणून सांगितले होते. त्यामुळे जेवण्यास येथेच यायचे होते. मडिकेरी ही कुर्ग जिल्ह्याची राजधानी आहे. या जिल्ह्याने भारताला दोन सेनापती दिलेले आहेत. ज. करिअप्पा आणि ज. बेवूर देवाने जाहीर केले.

मॅसा च्या ओळखीने दुसर्‍या दिवशी आजूबाजूची चांगली ठिकाणे पाहण्यासाठी खाजगी गाडी ठरवली. आमच्या चक्रधारींना तेवढाच एक दिवसाचा ब्रेक. मॅसा नी केटीडीसी चे माहितीपत्रक दिले होतेच. कोणकोणती ठिकाणे पाहावीत हे नंतर ठरवू. पदयात्रेला निघालो.

आपले विश्रामधाम (इंद्रजाल कॉमिक्समधील उर्फ़ वेताळाच्या कॉमिक्समधील वाम्बा विश्रामधाम आठवले का?) मडिकेरी शहराच्या सर्वांत उंचावरच्या ठिकाणी आहे. आवारातून बाहेर पडतांनाच चांगलाच उतार आहे. बाजूलाच उजवीकडे फ़र्लांगभर अंतरावर किंग्स पॉईंट की सुलतान पॉईंट की जनरल पॉईंट आहे. आता बरोबर आठवत नाही. पण तो राजा, जनरल की सुलतान येथे येऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असे. त्यामुळे हे नाव पडले. काहीहि असो. अशा रम्य ठिकाणी येऊन बसणार हा मनुष्य नक्कीच रसिक होता म्हणायचा. इथून लगेच रस्ता डावीकडे वळतो. जरासे पुढे उतारावरील कोपर्‍यावर एक सिनेमा थिएटर आहे. रस्त्याने चालतांना आजुबाजूंनी सजून फ़िरायला जाणार्‍या कुटुंबांचे आनंदी व उत्साही घोळके दिसत होते. कांही लोक खरेच केटीडीसीच्याच कॆंटीनच्या दिशेने सहकुटुंब (बहुधा जेवायला) जात होते. किंग्स पार्कनंतर केटीडीसीखेरीज दुसरे काही नाही. डेड एंड. त्यामुळे ते तेथेच जात होते. असो. सिनेमाथिएटरच्या दरवाजांत थोडी गर्दी दिसली. साउंड सिस्टीमवरील मंद कर्नाटक शास्त्रीय संगीताने वातावरण धुंद केले होते. आत शास्त्रीय संगीताच्या मैफ़िलीचे वातावरण दिसत होते. अशी पर्वणी पाहून मी मोहरून गेलो. वर जाऊन चौकशी केली. स्वागतासाठी कही सद्गृहस्थ दरवाजाबाहेरच उभे होते. यांनी अगत्याने माहिती दिली. तो एका शास्त्रीय नृत्यसंस्थेचा सोहळा होता. दरवर्षी येथे शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा नवरात्राच्या पहिल्या दिवशी सुरु होतात व दसर्‍याच्या दिवशी निकाल व ब़क्षीस समारंभ होतो. प्रवेश विनामूल्य असतो. त्यांनी आग्रहाचे निमंत्र्ण दिले. आता अशी गोष्ट सांगतो की दाक्षिणात्यांच्या कलाप्रेमाला त्रिवार प्रणाम कराल. माझी हॅट ऑफ़. थिएटरमालक स्पर्धेसाठी थिएटर विनामूल्य देतात. मी रस्त्यावर परत आलो. सगळे दूर पुढे गेले होते. मी अति उत्साहात न सांगता गायब झाल्यामुळे मला शोधत होते. त्यांना सांगितले. सर्वांनी याचे कौतुक केले. परंतु अर्धापाऊण तास फ़िरून मग येण्याचे ठरले. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. प्रवेश विनामूल्य. तेव्हापासून माझी हॅट कायम ऑफ़ आहे. मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा वातानुकूलन यंत्राचे विजेचे बिल कमी यावे म्हणून पैशाला हपापलेले थिएटरमालक सिनेमा चालू असतांना वातनुकूलन यंत्र मधेच बंद करतात. रसिक उकडून मेले काय किंवा बाहेर गेले काय! तिकिटाचे पैसे मिळाल्यावर त्यांना सोयरसुतक नसते. मी किमान पाचसहा वेळा वेगवेगळ्या थिएटरमधून सिनेमा सोडून गेलो आहे. अपवाद द़क्षिण (पुन्हा दक्षिणच बरे का) मुंबईतील इंग्रजी चित्रपट दाखविणार्‍या थिएटर्सचा. गेल्या वीसएक वर्षानंतर मी थिएटरमध्ये सिनेमा पाहिला तो होम अलोन. एक्सेलसिअरमध्ये. मुलाला दाखविण्यासाठी. सुदैवाने तेव्हा मात्र तसे काही झाले नाही. ते द़क्षिण मुम्बईत आहे. असो. हवा अप्रतिम होती सुमारे १५ ते १८ अंश सें. सापेक्ष आर्द्रता २५ तो ३५ च्या दरम्यान. ही सगळी अनुमाने. उपकरण आपली त्वचा. पण हवा उत्तम म्हणजे कशी हे कळावे म्हणून सांगितले. सगळीकडे घरोघरी, दुकानोदुकानी फ़ुलांची व दिव्यांची तोरणे लावलेली. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचे मंजुळ ध्वनि, नवे पोषाख परिधान करुन येणारे जाणारे लोक, हलकेच उतरणारे धुके, भूलोकीचा स्वर्गच हा. स्वप्न याहून काय वेगळे असते?.

थोडे फ़िरल्यावर भुकेची जाणीव झाली व मागे फ़िरलो. मासे नसल्यामुळे शाकाहारीच जेवण करण्याचे ठरले. थंडी वाढून तापमान बहुधा पंधराखाली घसरले असावे. चविष्ट जेवण, प्रसन्न मनस्थिति व छान हवा त्यामुळे दुप्पट जेवलो. येथील डायनिंग हॉल प्रचंड आहे. त्यामुळे गर्दी जाणवली नाही. विश्रामधाम तसे रिकामेच होते. बाहेरील स्थानिक लोकच जास्त होते. मॅसा खरेच बोलले होते. शेटजींनी ऋचिपालट म्हणून एक डिश चिकनची मागवली. ती फारच चविष्ट असल्याचा अभिप्राय जाड्याने दिला. मास्तरांनी परीक्षण करुन हा अहवाल सत्य असल्याची साक्ष दिली. मी व देवा तसे शाकाहारप्रेमी. आम्ही आमच्या पदार्थाना चांगला न्याय दिला. कितीहि चांगले जेवण असो. नार्‍या नाक मुरडतोच. तो देखील (जेवणात नसलेले) मूग गिळून होता. हेच मोठे प्रशस्तिपत्र होय. उर्दूवाचन माफ़क व योग्य होते. पैसा वसूल. मॅसांचे आपुलकीच्या सल्ल्याबद्दल आभार मानले. कडक थंडी व धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा फ़िरायला बाहेर पडलो. मास्तर व देवा यांच्या श्रमांना आलेले फ़ळ फ़ारच रसाळ होते. आज सात वर्षानंतर सुद्धा या आठवणीनी मला हे टंकतांना पुनरानुभव येत आहे व रोमांच उभे राहताहेत. पीसीओवरुन घरी फ़ोन केले. तेव्हा मोबाईल कॉलचे दर फ़ार होते. बहुधा रात्री ४ रू. व पीक अवर्समध्ये १६ रू. मिनिट. रेंज पण ठराविक ठिकाणींच मिळत असे. फ़ोनवर बायकोशी बोलतांना विवाहितांनी (जाड्याच्या म्हणण्याप्रमाणे) नेहमीच्या सवयीमुळे गुढगे टेकल्यामुळे या सोहळ्याचे जाड्याने गुढगे टेकणे असे नामकरण केले. हा वाक्प्रचार आम्ही अद्याप वापरतो. अकराच्या सुमाराला एका स्वप्नातून दुस-या स्वप्नात जाण्यासाठी सज्ज झालो.

४ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पाचला उठलो. मस्त थंडी होती. बहुधा दहाबारा अंशांच्या आसपास असावी. व्यायाम वगैरे आटोपून सहासव्वासहाला बाहेर पडलो. शेटजी नुकतेच उठत होते. दाढी केल्यावर फ़ारच ताजेतवाने वाटले. शेटजीचे आटपेपर्यंत रस्त्यावरून एक पायी छोटीसी रपेट करून आलो. आंघोळ संध्याकाळी करायचे ठरले. ठरल्याप्रमाणे आम्ही पावणेसातला तयार झालो. पाचच मिनिटात आमची गाडी आली. ऍम्बॅसॅडर होती. शेटजी व मी दोघे बारीक लोक पुढे बसलो. मास्तर, जाड्या व देवा मागे. मास्तरांना व देवाला क्वचितच मागे बसायला मिळते. बरोबर सातला ठरल्याप्रमाणे निघालो. दोनतीन ठिकाणे पाहून झर्‍यावर गेलो. वेलचीची, कॉफ़ीची, कोकोची मिरीची आणि जायफ़ळाची झाडे पाहिली. छोटासा धबधबा होता. त्याचे पाणी प्यालो. त्यासमोरच एक छोटासा पूल होता. फ़ोटो काढायला फ़ार सोयीचा होता. फ़ोटो काढले. या ठिकाणची एक गंमत नार्‍याने जाड्याच्या घेतलेल्या फ़िरकीमुळे आमच्या वर्तुळात फ़ारच गाजले. अजूनहि गाजते आहो. इथे एक शीतपेयांची टपरी आहे. एक महिलेने चालविलेली. एक मध्यमवयीन महिला व तिची तरूण मुलगी. आम्ही जिथे झर्‍याचें पाणी प्यालो तिथे जाड्या देखील पाणी प्याला. पण त्याने या टपरीवर बिसलेरीची बाटली घेतली. खरे म्हणजे ती नंतर गाडीत पिण्यासाठी घेतली. पण नार्‍याने आरोप केला की ती टपरीवरच्या तरुणीकडे पाहूनच घेतली. या बाटलीचे चौदा रुपये अजून नार्‍याने जाड्याला दिलेले नाहीत. कारण काय? तर म्हणे मोटिव्ह इज नॉट फेअर. अजूनहि आम्ही जाड्याला या विषयावरून छळतो. निसर्गधाम या अभयारण्याकडे निघालो.

नदीच्या प्रवाहातील एक प्रचंड बेटावर हे आहे. गाडी प्रवेशाजवळ सोडावी लागते. झुलत्या पुलावरुन प्रवेश करावा लागतो. साधारणपणे साडेनऊ दहा वाजले असावेत. गाडीचा नंबर कंडक्टर कम मुनीमजी ऊर्फ़ शेटजीनी लिहून घेतला होताच. आमच्या ड्रायव्हरच्या ओळखीचा गाईड घेतला. तिथे नवरात्राचा स्थानिक उत्सव चालू असल्यामुळे व सीझन अद्याप सुरु न झाल्यामुळे यात्रेकरु जवळ जवळ नव्हते. समुद्रसपाटीपासून फ़ारसे उंच नसल्यामुळे किंचित उकडत होते. गर्द वनराईमुळे तसे आल्हाददायकच वाटत होते व वाढत्या उन्हाचा कडाका जाणवला नाही. आंबा, चिंच, साग, इ. माहितीचे तसेच मीं पूर्वीं न पहिलेले प्रचंड व विविध वृक्ष, मध्येच बांबूची बने, विविध वेली व झुडुपे,विविध प़क्षी होते. प़क्षी जरी सहज दिसत नसले तरी त्यांचे कूजन सतत चालू होते. काळ्या तोंडाची बलदंड माकडे, एखादे मुंगूस, मुंग्यादि कीटक आणि आम्ही वगळता प्राणी फ़ारसे दिसले नाहींत. मध्येंच नदीचे उपप्रवाह होते. ते ओलांडण्यासाठी साकवांची योजना केली होती. विविध रंगांची पोहोणारी व उडणारी बदके व चारपाच प्रकारचे बगळे पाहिले. मल्हाराचा अंमल अद्याप न संपल्यामुळे नदीचे पाणी लाल होते. म्हणून मासे व जलसृष्टी साकवावरून दिसू शकली नाही. ठिकठिकाणी झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची मचाणे बांधली होती. त्यावर चढून फ़ोटो काढण्याचे पवित्र कार्य उत्स्फ़ूर्तपणे पार पाडलेच. मचाणांवर चढणे तसे सोपे नाही. तंदुरुस्त असल्यावर मात्र कांही वाटत नाहीं. परंतु जास्त उंचावरील मचाणावरुन दिसणारे दृश्य मात्र विहंगम (पॅनोरमिक) दिसते. किती सुंदर याची कल्पना खालून येणार नाही. काही मचाणाचे दोरखंडाच्या शिड्या फ़ारच जुन्या व कोरम झाल्या होत्या. त्यावर फ़क्त मी, शेटजी व देवाच जाऊ शकलो. कमी वजनाचे किती हे फ़ायदे! हो ठिकाण सुंदर व रम्य होते. साडेबाराच्या सुमाराला जड पावलांनी तेथून निघालो. गाईडमुळे बाहेर पडण्याचे ठिकाण शोधायला लागले नाही. ते बहुधा प्रवेशापासून एकदीड फ़र्लांगावर असावे - त्याच रस्त्याला लागून होते. गाडी ड्रायव्हरने बरोबर योग्य ठिकाणी उभी केली होती. गाईड व ड्रायव्हर दोघांनी आमचा तासभर तरी वाचवला होता. आता विरुद्ध बाजूला जावयाचे होते.

विश्रामधाम वाटेवरच होते. पोटभर सुग्रास जेवण जमलेच तर १५ - २० मिनिटंची वामकुक्षी व दुसर्‍या बाजूची स्थळे पहाणे. प्लान जरी एकमेकांच्या मतांनुसार लोकशाही पद्धतीने का होईना परंतु फ़ारच कौशल्याने तयार केला होता. सारथ्यांचा यात सिंहाचा खरे म्हणजे १०० टक्के वाट होता. कारण सारथ्थ्याच्या सोईनुसार स्थानिक नकाशा पाहून आखला होता. मूळ कल्पना त्यांचीच होती. आमचे सोडाच जाड्यासारख्या दिशाभ्रमिष्टाचेहि मत घेण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला. आम्ही फ़क्त ती योजना न बुडविण्याचे पुण्य(कृत्य) केले होते. क्रिकेटमधील फ़लंदाज जोडीदारावर जसा विश्वास ठेऊन धाव घेतो तसे. या विश्वासाचे त्यांनी सोने केले. पुढील सर्व दीर्घ पल्ल्याच्या सहलीत तोच साचा कायम ठेवला. ते तिघे देखील हॉटेलच्या बाबतीत मी व जाड्या या जोडीवर असाच विश्वास ठेवीत आले.

पुन्हा घाटमाथ्यावर आल्यामुळे ऊन जाणवत नव्ह्ते. तपमान पंचवीसच्या आसपास असावे. विधा वर आल्यावर पटापट थंड पाण्याने आंघोळी केल्या. अर्थातच चोवीस तासांत दुसर्‍यांदा आंघोळ केल्यामुळे हिंदु धर्म बुडेल काय असे आम्ही मास्तरांना म्हणजे विचारले. मास्तरांनी हरकत नसल्याचा निर्वाळा दिला. एका सच्छील ब्राह्मणाचीच आज्ञा ती. त्यामुळे अजून काही आम्ही धर्मभ्रष्ट झालो नाहीं. आपला धर्म अजून शाबूत आहे बरे का. जेवलो. खरोख्रच १५ मिनिटांची वामकुक्षी घेतली. त्या हवेत या छोट्या विश्रांतीचा केवढा परिणाम जाणवला. पुन्हा तंदुरुस्त होवून उत्साहाने ओसंडून गेलो. जणु कांही सोळा सतरा वर्षाचेच होतो. मन तरूण हवे हेच खरे. अडीचच्या दरम्यान निघालो. एकदोन पॉईंट्स पाहून ऍजेंड्यावरील ठळक ठिकाण असलेल्या धरणावर गेलो. कडक ऊन. तरीहि तपमान फ़क्त सुमारे तीसएक अंश असावे. नदीवरून गार वार येत होता. देवातील घिसाडी म्हणजे अभियंता जागा झाला. कर्म-धर्म-संयोगाने त्याला धरणावरील एक अभियंता भेटला. पाणी कसे सोडतात, टर्बाईन्स कशी फ़िरतात, जनित्रे कशी फ़िरतात याचा त्याने तासभर अभ्यास केला. त्याची टवाळी करायला आम्हाला आणखी वाव मिळाला. संध्याकाळपर्यंत परतलो. पुन्हा एकदा मास्तरांच्या परवानगीने आंघोळ केली. परंतु गरम पाण्याची. गर्व से कहो हम ... असो. विधा वर गरम पाणी फ़क्त सकाळी मिळते. पण मॅसा नी खास सोय केली.

लवकर जेवून पुन्हा नऊसाडेनऊला ते धुक्यातील स्वप्नमय वातावरण अनुभवण्यास बाहेर पडलो. तशीच हवा, तशीच धुक्याची दुलई, थिएटरबाहेरचे तेच वातावरण, तेच संगीत. काळ तिथेच थबकला तर काय बहार होईल? आणि तेच गुढगे टेकणे. मी व जाड्याने घरी फ़ोन केले व रस्त्यावर मास्तरीण काय म्हणत असेल, शेटजीणबाई व सौ देवा काय बोलत असतील व आपल्या मित्रांना कसे फ़ैलावर घेत असतील व आपल्या मित्रांना असे वारंवार गुढगे टेकल्यामुळे कशी लौकरच गुढगेदुखी होईल अशा आचरट कल्पना करीत खिदळत उभे होतो. विधावर परतलो.

येथून केरळात तेल्लीचेरीला कोठून जायचे त्याचे मॅसाकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी आजची सफ़र कशी झाली याची आस्थेने चौकशी केली. व पुढील मार्गदर्शन मोठ्या उत्साहने केले आणि पुढील प्रवासाला शुभेछा दिल्या. दुसर्‍या दिवशी सकाळीच बिल तयार ठेवायला सांगितले. दोरी सोडवली. पॅकिंग केले. दुसर्‍या दिवशी मॅसांनी खरोखरच साडेसहाला बिल दिले. चहाची पण व्यवस्था केली. कोण कोठले मॅसा - एक सरकारी अधिकारी. कोठे त्यांची तत्पर व हसतमुख सेवा, मैत्रीपूर्ण, सौहार्दाचे नम्र वागणे आणि कोठे रत्नागिरीची खाजगी सेवेतील आळशी ढिलाई.

क्रमशः

पूर्वप्रसिद्धी:http://www.misalpav.com/node/910

वाट फुटेल तिथे - २

रत्नागिरी आणि मुर्डेश्वर
२ ऑक्टोबर २०००.
सकाळी पाचला उठून पावणेसहा सहाला फिरायला बाहेर पडलो. नार्‍या हॉटेलातच थांबला. नार्‍याला उशिरा उठायला आवडते. त्यामुळे मी व जाड्या दाढी व्यायाम व आंघोळ आटोपेपर्यंत त्याला झोपायला मिळते. जाड्याला जास्त वेळ व्यायाम करावा लागतो. मला कमी. त्यामुळे त्याचा व्यायाम होईपर्यंत माझी दाढी व आंघोळ होते. अशा तर्‍हेने एक बाथरूम आम्हा तिघांना पुरते. अद्याप हॉटेलचे सर्व कर्मचारी झोपले होते. मराठी माणसाच्या या हॉटेलात साडेसहाला न्याहारी वा चहा सोडाच बिल मिळाले तरी खूप. मुंबईसारखीच घामट पण शुद्ध हवा. कुंद वातावरण. पण माझ्या उत्साहावर या गोष्टी पाणी ओतू शकत नाहीत. माझा रथ सदैव चार अंगुळे वरच. बोलण्यात आचराटपणा भरपूर. आचरटचार्य अशी पदवीच आहे माझ्याकडे. जाड्याच्या जिभेवर सदैव सरस्वतीचे नृत्य. साहजिकच सगळ्यांनाच चेव येतो. न्याहारीसाठी चांगले आरोग्य भुवन कोठे आहेत हे पाहून ठेवले. आज न्याहारी व दुपारचे जेवण याऐवजी ब्रंच घेऊन कालचा बॅकलॉग भरून काढू असे ठरवीत होतो. अपेक्षेप्रमाणे न्याहारी मिळाली नाहीच. बिलच साडेसातला मिळाले. नार्‍या आला. न्याहारीला बाहेरच्या आरोग्य भुवनांत बोलावून घेतले होते. ओम मोबाईल नम: (तेव्हा नवीनच आणि कॉल फार महाग होते) रत्नागिरी म्हणजे बटाटेवडे उत्तम असायला आपली हरकत नसते. परंतु आरोग्य भुवनवाल्याची हरकत होती. सगळेच पदार्थ सपक व बेचव होते. असो. उदरभरण झाले हेहि नसे थोडके. खाण्याच्या कोणत्याहि पदार्थाला नाव ठेवले की जाड्याला राग येतो. साले तुम्ही आयते खायला सोकावले आहात म्हणतो व फ़ैलावर घेतो. तो या संधीची वाटच पाहत होता. पण. पण आम्ही देखील अखेर त्याचेच मित्र. आमच्या चेहर्‍यावर त्याला तसे वाचता येत होते. त्यामुळेच आम्ही खोटेखोटे छानछान म्हणून खात होतो. स्वाभाविकच त्याची फार कुचंबणा झाली व आम्हा इतर चौघांना फारच मज्जा आली. खातांना चौघे एकमेकांकडे पाहून बराच वेळ गालातल्या गालात हसत होतो. फार म्हणजे फारच करमणूक झाली. साराच आचरटपणा. दुसरे काय! तोदेखील करावा म्हणून तर बाहेर पडलो.

निघालो नऊसाडेनऊला. पेट्रोल भरले. हवा तपासून घेतली व मार्गस्थ झालो. अर्ध्या तासात रा म मा १७ आला. दोन अडीच तासांनी ड्रायव्हरची पदावनती व किलींडरची पदोन्नती होत होती. रत्नागिरीच्या पुढे रा म मा १७ च्या दुतर्फा छान झाडे आहेत. घाट आला की वातानुकूलन बंद करावे लागे. कारण त्या इंजिनाच्या नाजूक जीवाला ते पेलत नसे. पण आपल्या मुंबईच्या मानाने हवा तशी बरी होती व घाटात हवा जरा थंडच असते. घामही फारसा आला नाही. घाट आला की सगळे गप्प होऊन निसर्ग सौंदर्य पाहाण्यात मग्न होत. याचा आणखी एक फायदा म्हणजे घाटात जेव्हा जास्त एकाग्रतेची गरज असते तेव्हा ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही. गोवा आले व गेले. कारवार जवळ येऊ लागले तसे जाड्याला ऊत आला. आमच्या सौ चे माहेर नन्दनगद्दा. कारवारपासून पाचएक किलोमीटर. ते कोठे आहे ते कारवारच्या पुलाअलिकडून त्याला दाखवले. लगेच त्याने आमच्या सौ ला "हर हायनेस प्रिन्सेस ऑफ नन्दनगद्दा" हा किताब जाहीर केला. साधारण तीन ते चारच्या दरम्यान तेथून जात होतो. दीडदोन तासांनी मुर्डेश्वरला पोहोचलो. रा म मा १७ ने दक्षिणेकडे जातांना मुर्डेश्वर स्टेशनकडून मुर्डेश्वरला जाण्यासाठी फाटा आहे. उजवीकडे क्षितिजावर शंकराची एक प्रचंड मूर्ती दिसू लागते.
खालील प्रकाशचित्र पाहा. नक्कीच वाईट आहे पण कल्पनायेईल


नंतर ती समोर दिसूं लागते. तेथे आर एन शेट्टी हे फार बडे प्रस्थ आहे हे जाणवत होते. रस्त्याने पाहावे तिथे आर एन शेट्टी. दोघेहि चालक फार थकले होते. कावळे सगळ्यांच्याच पोटात कोकलत होते. हॉटेले फ़ार महाग. पावसाची बुरबुरहि चालू झाली होती. हॉटेल शोधतांना किमान पाचसहा हॉटेले नापसंत करून आम्ही तिघांच्याहि वाट पाहाण्याच्या शक्तीचा अंत पाहिला. दर व सोयी यांचे गणित काही जुळता जुळेन. शेवटी आर एन शेट्टी ट्रस्टचे हॉस्टेल मिळले. त्याचे स्थान (लोकेशन) फारच रमणीय आहे. मागील बाजूने समुद्रात घुसले आहे. तीन बाजूंना समुद्र दिसतो. अलौकिक देखावा. ऑफसीझन असल्यामुळे जवळजवळ निम्मे दर होते. तेव्हा २००० साली नेहमीचा डबल ऑक्युपन्सीचा दर रू. ८५०.०० व ऑफ सीझन म्हणून रू. ४७५.०० होते. थोडक्यात म्हणजे उर्दूवाचन चांगले होते. हे आर एन शेट्टी बहुधा पुण्याचे असायला हरकत नाही. हॉटेलच्या कार्यालयाबाहेरच दरवाजाच्या डाव्या बाजूला लांबलचक भली मोठी पाटी होती. मद्यपान करू नये तसेच अंमली पदार्थ आणू नयेत. आढळल्यास बाहेर घालविले जाईल व भरलेले पैसे मिळणार नाहीत. एका रुमवर जास्तीत जास्त तिघांना राहता येईल. पाण्याचे ग्लास एका रूमवर दोनच मिळतील इ. इ. पण गंमत काय पाहा. या सगळ्या अटी होत्या. तारीख दोन ऑक्टोबर. गांधीजयंती म्हणजे दारूबंदीचा दिवस. तरीहि आजूबाजूच्या एकदोन खोल्यातून मद्यपींचा आरडओरडा ऐकू येत होता. गांधीजींनी त्यांना क्षमा केली असेलच. आंघोळी आटोपून उदरभरणास सज्ज झालो. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त शाकाहारी. नार्‍या व जाड्या मासे खायला सोकावलेले. म्हणून बाहेर गेलो. एका कळकट हॉटेलाबाहेर मसाल्याचा छान वास येत होता म्हणून तेथेच जेवलो. जेवण सुरेखच होते. गावठी अंडी होती म्हणून मी डाळभात भाजीबरोबर आम्लेट देखील खाल्ले. ते पण छान होते. कालचे उट्टे भरुन निघाले.

३ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पावणेसहा सहाला चौघे फिरायला बाहेर पडलो. बीचवरच गेलो. एवढा सुरेख लांबलचक बीच. पण आपल्या भारतीय लोकांना त्याचे सोयरसुतक नाही. सार्वजनिक ठिकाणीं जास्तीत जास्त घाण न केल्यास दंड असावा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण कचरा टाकल्यास वा थुंकल्यास पारितोषिके असावीत व प्रातर्विधी करणारांस सर्वांत मोठे पारितोषिक असावे अशी परिस्थिती होती. म्हणून न्याहारी करण्यासाठी परत फिरलो. नार्‍याला बोलावून घेतले. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक पदार्थ मिळतो. हल्ली सगळे लोक भरपूर पर्यटन करतात. त्यामुळे बहुतेकांना ठाऊक असेल. तरी पण न खाल्लेल्या लोकांसाठी सांगतो. घावनापेक्षा जाड व उत्तप्पापेक्षां किंवा आंबोळीपेक्षा पातळ असे तीन डोसे चटणी व सांबार. हा सेट डोसा फक्त कर्नाटकातच मिळतो. इडल्या, मेदूवडे, सर्वच पदार्थ चविष्ट होते. सांबार मात्र तूरडाळीचे नसून छोट्या चवळीचे आणि धणेयुक्त मसाल्याचे थोड्या वेगळ्या पण छान चवीचे होते. उपमादेखील छान होता. पाचजण असल्यामूळे प्रत्येकजण वेगळा पदार्थ मागवून चव पाहून आपला पुढील पदार्थ ठरवीत असे. फिल्टर कॉफ़ी दक्षिणेत अपेक्षेपेक्षा चांगली मिळते. न्याहारी करुन परतलो. सूर्यदर्शन झाले. स्वच्छ निळे आकाश, कोवळी सोनेरी उन्हे पसरलेली. अतिशय आल्हाह्दायक व उत्साहवर्धक वातावरण होते. आणि अहो आश्चर्यम! आमच्या वसतिस्थानासमोरच ती दुरुन दिसणारी प्रचंड मूर्ति तर होतीच. शिवाय गीतोपदेशाच्या रथाचा सिमेंटकॉंक्रीटमधील देखावा आणि आणखी कांहीं सुंदर देखावे होते.खालील प्रकाशचित्रे पाहा.




या परिसरात बरीच मंदिरे आहेत. काळ्या दगडातील प्राचीन आणि अंधारी. आंत येणारा जो कांही थोडाफार वा तुटपुंजा प्रकाश असेल तो काळ्या दगडामुळे जरादेखील परावर्तित होत नाही. मी ’काळ्या’ दगडाला नावे टेवली म्हणून सगळ्यांनी खंत व्यक्त केली. स्वत:च्या वर्णाचे थोडे तरी कौतुक असावे की राव. एवढे सुरेख स्थापत्य निर्माण करणे खायचे काम नाही. येथेच असे नाही पण सगळीकडील पुरातन बांधकामांत प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव आढळतो. गुहांतील बांधकामात आपण समजू शकतो की प्रकाश आंत आणण्यास फारसा वाव नसतो. पण बांधलेल्या मंदिरांचे काय? नैसर्गिक प्रकाश आत आलेला गाभारा मी अजून पाहिला नाही. या अंधारावर वास्तुशास्त्रज्ञच प्रकाश टाकूं शकतील. कदाचित टाकलेला देखील असेल आणि माझा तो विषय नसल्यामुळे हे माझे अज्ञान अद्याप दूर झाले नसेल. असो. मला तरी हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.पन्नास पैशापेक्षां कमी किंमतीची नाणीं मुंबई-पुण्यांत पाहायला देखील नाहींत. भिकारी देखील घेत नाहीत. नार्‍या जातीने वैश्यवाणी असल्यामुळे त्याला आम्हीं शेटजी म्हणतो. अशी कांही नाणीं त्याने आणली होती. बहुतेक पन्नास पाऊणशे रुपये असावेत. त्यामुळे त्याच्या औदार्याला उधाण आले होते. त्याच्या संधिसाधू औदार्यावरुन त्याची भरपूर टिंगल केली. नंतर देखील फिरक्या घेण्यास अजून एक विषय मिळाला. धार्मिक असा तो आमच्यात एकटाच असल्यामुळे तो अल्पमतात होत. फारच मजा आली. इतर सर्व ठिकाणी नेहमी आम्हीच अल्पमतात असतो. फोटोबिटो कढून निघण्यास साडेदहा अकरा वाजले. येथून मडिकेरी फारसे दूर नाही. आमच्या नकाशात मंगलोरच्या पुढे बंगलोर रस्त्यावर बंटवालच्या पुढे लगेच उजवीकडे मडिकेरीचा फाटा दिसत होता. परंतु बंटवाल रस्त्यापासून थोडे दूर दिसत होते. मंगलोरचे रस्ते स्वच्छ व चांगले वाटले. बंगलोरची दिशा दाखवणारे बाण बहुतेक मोठ्या नाक्यावर होते. जेथे नव्हते तेथे विचारीत पुढे गेलो. अखेर मडिकेरीचा फाटा सापडला. हळू हळू झाडोरा वाढू लागला. पावसाळ्याची अखेर असल्यामुळे रस्ता मात्र खराब होता. वेग पंचवीसवर आला. हवेत गारवा यायला लागला. समोर डोंगर दिसू लागले. चढ वाढू लागला. वळणे येऊ लागली. रबराची झाडे मी यापूर्वी पाहिली नव्हती. ती दिसू लागली. आमच्या चित्तवृत्तींचा बहर वाढू लागला. चढावामुळे .. पायातील नव्हे .. सरासरी वेग आणखी कमी झाला. आजूबाजूला जमिनीच्या कुंपणांकित आयतांमध्ये विविध नावांच्या पाट्या दिसू लागल्या. चहाचे मळे कोणाला पाहायचेत . . देवा किलींडरने विचारले. लवकरच पाहायला तयार व्हा म्हणून मास्तरांनी घोषणा केली. आमच्या उत्साहाला आणखी धुमारे फ़ुटले. एक घाट संपून दुसरा येऊ लागला. रस्ता वाईटच. एक डोंगर संपून दुसरा दिसू लागे. आता सर्वजण मैलाचे दगड वाचू लागलो. चार कन्नड दगडानंतर पाचवा एक इंग्रजी दगड असे प्रमाण होते. वाईट व घाटाचा वळणावळणांचा रस्ता म्हणून दोघेहि चक्रधर फार थकले होते. दीडदोन वाजले असावेत. मी मनगटी घड्याळ वापरीत नाही याबद्दल क्षमस्व. याची शिक्षा म्हणून नार्‍याने माझ्यावर भरपूर दुगाण्या झाडल्या. त्याच्या देखील हाताला घड्याळ नव्हते याची मी त्याला जाणीव करून दिली. परंतु त्याचे नुकतेच पडून फ़ुटले म्हणून त्याला ते माफ असा त्याचा दावा होता. मी तर कधीच बांधत नाही. पण तुझा वेंधळेपणा कसा काय क्षम्य? या प्रश्नावर तो फार उखडला. त्यामुळे इतर तिघे माझ्याशी सहमत झाले. म्हणून त्याला खूप चिडवले. मज्जा आली.

पूर्वप्रसिद्धी:(Published earlier): http://www.misalpav.com/node/837


वाट फुटेल तिथे - १

वाट फुटेल तिथे १

ही कथा आहे एका प्रवासाची. प्रवास आहे दक्षिण भारताचा. ५००० कि.मी. पेक्षा जास्त. पण एका छोट्या मारुती ८०० मधून केलेला. हातात नकाशा घेऊन केलेला एक मनोरंजक, बिनधास्त प्रवास.

आम्ही म्हणजे मी आणि आमचे मित्र. यथावकाश एकेकाचा परिचय होईलच. एकाचे नाव जाड्या. हा या प्रवासात होता. खरे म्हणजे याच्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरी अजून एकत्र येतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे या ओळी याला पाहूनच सुचल्या याबद्दल आम्हाला तिळमात्रहि शंका नाही. अविवाहिततेचे अनंत फायदे पाहा. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफाट. हजरजबाबी तसाच. कोणाची फिरकी केव्हा कशी घेईल याचा कांही नेम नाही. याचे बरेच मोठे गुण आहेत. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. खाण्याबाबतीत बकासूर देखील लाजेल. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फार लोकप्रिय. फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर सौ. गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचा फोन आहे. आमच्यातील एकाचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा एकदा याचा फोन गेला. संक्रांतीचा दिवस होता. १९८२ च्या सुमाराची गोष्ट. "पुरणपोळ्या केल्या की नाहीत? खायला येतो." ती बावचळून म्हणाली "आता कुठे? होळीला करतात." हे महाशय म्हणाले "होळीच्या दिवशी तर किशोर म्हणाला की संक्रांतीला करतात." बिचारा किशोर होळीच्या दिवशी जाड्याच्या ऑफिसात पुरणपोळ्यांचा डबा घेऊन हजर. तर असे हे आमचे मित्ररत्न. पार्ट्या व पिकनिक्स याचे हवन याच पठ्ठ्याने अविरत चालू ठेवले. वर्षाला दोनपांच पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. १९९७ पासून वर्षाला पाचसहा पिकनिक्स असतात. हल्ली फोनाफोनीमुळे व मेलामेलीमुळे तसेच चॅटमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गप्पा होतात. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या तीन सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे आजूनहि वाटते एवढ्या ताज्या आहेत. लिप्टन चहाएवढ्या. त्यापैकी पहिल्या सहलीच्या या आठवणी.

मुले मोठी झाली तसे आम्ही कौटुंबिक जबाबदारीतून थोडेफार मोकळे झालो. आमचे पुत्ररत्न पण १० वीत गेले. क्लासमुळे तो अभ्यासात पण अधिक स्वयंपूर्ण झाला. (शेवटी माझ्याच वळणावर गेला) सौ चा वेळ त्याच्या उस्तवारीत जाऊ लागला. ती गृहस्वामिनी आहे. अर्थात नोकरी करीत नाही. मी जास्तच मोकळा झालो. इतरांची मुले १ वा २ वर्षे पुढेमागे. साहाजिकच आम्हाला दूरच्या प्रवासाची स्वप्ने पडू लागली. तसे आम्ही काही अगोदर ठरविले नवह्ते म्हणा. पण म्हणतात ना ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. आणि आम्ही स्वत:ला विद्वान (असलो तरी) समजत नाही. शेवडे व देवा म्हणजे देवगांवकर यांनी ठरविले की दूरच्या प्रवासाला मारुती ८०० घेऊन जायचे. आणखी कोण येवो अथवा न येवो. दोघेच तरी जाऊ. जाड्या हे आमचे मध्यवर्ती दळणवळण केंद्र आहे. जाड्या तिसरा बहुतेक येईल. आलाच तर कालू. म्हणजे अस्मादिक. तुम्हाला म्हणून सांगतो, हे सगळे माझ्या रंगावर जळतात. कुठे जायचे? प्रथम सर्वजण रजा टाकू. नकाशा घेऊन वाट फ़ुटेल तिथेल जाऊ. रजा सलामत तो स्थळे पचास. गणेशोत्सव चालू होता. आत एकेकाच्या रजेच्या तारखांची जुळ्वाजुळव. देवाची मारुती ८०० घेऊन पुण्याला जायचे. शेवडेच्या मारुती ८०० मध्ये बसायचे व निघायचे. वाट फ़ुटेल तिथे. अरे हो. सांगायचे राहून गेले. या दोघांचेहि ड्रायव्हिंग उत्कृष्ट. सुरक्षित आणि गाडीचे वजन, रस्ता पकडण्याची कुवत व रस्त्याची स्थिति या गोष्टींना अनुसरून योग्य त्या वेगात. नाहीतर स्वर्गातच जावे लागायचे. अर्थात आम्ही पुण्यवंत असल्यामुळे. आमचा चिन्या जोशी नावाचा एक मित्र आहे. याचा रंग माझ्यासारखा. म्हणून याला आम्ही किरवंत म्हणतो. हा देखील जगी सर्वसुखी अर्थात अविवाहित आहे. "फक्त मुलांच्या" शाळेत वाढल्यामुळे वाह्यात विचार येतात. विषयांतराबद्दल क्षमस्व. असो. तर द्वारकाधीश कृष्ण वा मद्रनरेश शल्याला लाजविणारे दोन थोर सारथी आम्हा भाग्यवंतांच्या समवेत होते आणि अजून आहेत. अखेर १ ऑक्टोबर २००० ही तारीख ठरली. नवरात्राचा पहिला दिवस. सरत्या पावसाची मजा कांही औरच. रजा टाकल्या. भरपूर अवकाश असल्यामुळे रजा मान्य न होण्याचा प्रश्न नव्हता. कुठे जायचे? दक्षिणेलाच जाऊ. मी शाकाहारी. शेवडे व देवा ब्राह्मण म्हणजे शाकाहारातच जन्म काढलेले. इडल्या डोसे मिळ्तील. खाण्याची आबाळ होणार नाही. मला नाहींतरी काळ्या वर्णाचे आकर्षण आहेच इति इतर. जाड्या जरी अट्टल मांसाहारी किंबहुना मांसाहाराच्या व्यसनांत अडकलेला असला तरी तो कांहीहि आणि कितीहि खाऊ शकतो. त्याने आयुष्यात एकदाच खाण्याचा पदार्थ टाकला आहे. बॅंकॉकच्या हॉटेलातील मगरीचे सूप. पण ते मगरीचे आहे हे ठाऊक असून त्याने ते मागविले. काय हे धारिष्ट्य? तर ठरले. चलो दक्षिण भारत. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन ..... निघण्याआधी एक आठवडा तिघा मुंबईकरांची बैठक झाली. सोबत नाही म्हणत असणारा चौथा मुम्बईकर नार्‍या ऊर्फ नारकर असे. फोनाफोनी चालूच होती. शेवडेमास्तर (पुण्याचे असल्यामुळे) फोनवर होतेच. हा सद्गृहस्थ प्राचीन काळी मिलमध्ये वस्त्र अभिअयंता होता. तेथे याला मास्तर म्हणत. म्हणून हा मास्तर. रुट ठरला. पुणे कोयना मार्गे राष्ट्रीय महामार्ग १७ म्हणजे मुंबई गोवा रस्ता पकडायचा या रस्त्याने गोवा मुर्डेश्वर-मडिकेरी तेथून केरळात उतरायचे. रा म मा १७ ने तेल्लीचेरी-माहे-कोझीकोडे- एर्नाकुलम-अलेप्पी मार्गे कन्याकुमारी. रस्त्याचा नकाशा नकाशा घेऊन जायचे. रा म मा १७च कां? कारण या रस्त्याला रहदारी कमी असते म्हणून ड्रायव्हिंग सोपे जाते फक्त दिवसा चांगल्या उजेडातच सारथ्य करावयाचे. ऊगीच किरवंताला काम नको. सालेमकडून येणार्‍या सालेम कन्याकुमारी रा म मा ४७ ईडपल्ली येथे रा म मा १७ ला मिळतो. त्यामुळे रस्त्याच्या ईडपल्लीपुढील भागाला रा म मा ४७ म्हणतात. त्याने पुढे कन्याकुमारीला जाऊन मग मागे वळायचे असा बेत ठरला. येतांनाचा मार्ग येतांनाच ठरवू. फक्त फ्लेक्सिबल सामान घ्यावयाचे. कमीत कमी सामान ही सुखाच्या प्रवासाची गुरुकिल्ली आहेच. दोनचार हाफपॅंटी व दोनचार टी शर्ट, पुरेशी साताठ अंतर्वस्त्रे, दाढीचे सामान, माफक औषधे - ऍस्पिरीन, पॅरासीटमॉल, लोमोटील, जेल्युसील वगैरे गोळ्या, टोपी, छत्री, बटरी, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, दोरीसाठी इंग्रजी एस आकाराचे पोलादी हूक, चाकू, बस्स. सुदैवाने पन्नाशी ओलांडली तरी आमच्यापैकी कुणालाच अजून कोणत्याहि गोळ्यांची अद्याप लागण झालेली नाही. ही तर ७ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असो. मारुती ८०० मधे पावसामुळे कॅरिअर नसतांना चारपाच बॅगांखेरीज आणखी काय राहणार? गंमत म्हणजे पाचवा नार्‍या बरेच आढेवेढे घेतल्यानंतर तयार झाला. तसे आम्ही त्याच्या मागे होतोच. एकंदरीत आमचा उत्साह व नकाशा घेऊन जाण्यातील थरार त्याला दूर ठेऊ शकला नाही. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. दर बैठकीला तो हजर असेच पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने होकार भरला नव्हता. मारुती ८०० मध्ये पाचवा म्हणजे अतीच. परंतु खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याची अडचण वा गर्दी जाणवणार नव्ह्ती फक्त त्याची बॅग मागील कांचेवर येणार होती. मुख्य म्हणजे आमच्या सारथ्यांना हे मान्य होते. नार्‍याचा एक गुण आहे. नार्‍या हिशेब चोख ठेवतो. प्रत्येकाकडून व्यवस्थित पैसे जमा करतो मोत्यासारख्या अक्षरांत हिशेब लिहितो झोपण्यापूर्वी प्रत्येकाला काही खर्च केला की काय हे विचारतो व असल्यास त्वरित पूलमधून देऊन टाकतो. थोडक्यात म्हणजे तो चांगला रोखपाल म्हणाजे कॅशिअर आहे. या वेळी त्याने पूलचे पैसे ठेवायला बस कंडक्टरसारखी बॅग आणली होती. लेजरच्या आकाराची उभी व नारिंगी रंगाची चामड्याची. ती तो या सहलीत प्रत्येक ठिकाणी आणत असे. सकाळी तो रूमवरून निघतांना ती जी खांद्याला लटकवायचा ती संध्याकाळी रूमवरच उतरवायचा.

पाचहि जण उत्कंठेने व उत्साहाने भारून गेलो होतो काय करू आणि काय नको असे झाले होते. फोनाफोनीला वेग आला होत. केव्हा एकदा १ तारीख उजाडते असे झाले होते. माझ्या कल्पनेचा वारु उधळायला नेहमीप्रमाणे दशदिशा मोकळ्या होत्याच. सगळे जग नेहमीपेक्षा सुंदर आणि भव्य वाटायला लागले होते. आम्ही सगळ्यांनी पुन्हा वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण केले.

१ ऑक्टोबर २०००
अखेर १ तारीख उजाडली. जाड्याची एक गंमत आहे. त्याला अजिबात दिशाज्ञान नाही. त्याच्या स्वत:च्या घरासमोर त्याला स्वत:भोवती गरगर फ़िरवून सोडले तरी त्याला स्वत:चे घर दाखवता येईल की नाही याबद्दल शंकाच आहे. तरी त्याला घेऊन योग्य ठिकाणी ऊभे राहण्याची जबाबदारी माझी. केवढा जबाबदार माणूस मी! कालू दा जबाब नही . तर याला घेऊन मी कलानगरच्या नाक्यावर उभा राहिलो. देवा बांगूर नगरवरून निघाला. त्याने सांताक्रूझ सबवेसमोर हायवेला नार्‍याला घेतले व आम्हाला कलानगरला घेतले आणि आम्ही पुण्याकडे कूच केले. आम्हा सर्वांचा एक साधा पण चांगला गुण म्हणजे वक्तशीरपणा. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बरोबर सात ऐवजी पावणेसातला कलानगरवरून निघालो. वेळ न पाळणारांना आम्ही कटवले हो सूज्ञांच्या लक्षांत आले असेलच. रहदारीची गर्दी होण्यापूर्वी निघाल्यामुळे योग्य त्या वेगाने जाऊन पुण्याला मास्तरांच्या घराखाली ठरल्याप्रमाणे बरोबर साडेदहाला पोहोचलो. तेव्हा दृतगती मार्ग अर्धाच झाला होता. परंतु जयंतराव टिळकांना त्याबद्दल सलाम केला. भ्रमण्ध्वनीवरून फोनाफोनी चालू होतीच. जाड्याच्या रसनेवर सरस्वती नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहाने नृत्य करीत होती. पुणे कधी आले कळले देखील नाही. आदल्या दिवशीच मास्तरांनी गाडी सर्व्हिस करून घेऊन पेट्रोल भरून हवापाणी आणि ऑईल ठीक करून तयार ठेवली होतीच. ताबडतोब या गाडीतून सामान त्या गाडीत टाकले व पाच मिनिटात निघालो. सौ. मास्तरांचे न्याहारीचे आमंत्रण साभार टाळले. कठोर निग्रह बरें. खरे म्हणजे आमचे जिभेवर नियंत्रण नाही म्हणून ती टिंगल करेल हीच भीती जास्त होती. पण पहिले म्हणजे आमच्या वेळापत्रकाचे बारा वाजले असते. आणि दुसरे म्हणजे खाणेपिणे टाळता येण्याएवढा निग्रह आमच्याकडे नसल्याबद्दल सौ मास्तर किंवा मास्तरीणबाईंनी आमची भरपूर टिंगल केली असती. देवाची पदावनति होऊन किलींडरच्या जागेवर आणि मी सर्वांत बारीक असल्यामुळे मागे डावीकडे जाड्या व उजवीकडे नार्‍या या दोघांच्या मध्ये अशी पदावनति झाली.

सातारा रस्त्यावरून उजवे वळण घेतले आणि रहदारी कमी झाली. दूर आल्यासारखे वाटायला लागले आम्ही आमच्या डोमेनमध्ये... अपेक्षित दुनियेत येऊन पोहोचलो असे वाटायला लागले. थोडेसे ढगाळलेलेच होते. रस्ता खराब असल्यामुळे सारथ्याची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून वटवट कमी करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होतो. वेग २० - २५ वर आला. घाई कुणाला होती. आमची घाई सकाळी निघेपर्यंत. नंतर प्रवासाचा आस्वाद घेणे. दीडदोन तासांनी सारथ्याला विश्रांति देण्यासाठी ब्रेक घ्यायचा. ड्रायव्हर व किलींडर यांची अदलाबदल करायची. ताजेतवाने व्हायचे. झालेच तर एखादा चहा व पुन्हा पुढे निघायचे. पहिलाच दिवस असल्यामुळे उत्साह ओसंडून वहात होता. हास्यविनोदाला उधाण आले होते. रा म मा १७ आल्यावरच जाड्याला परमेश्वराचा पहिला अवतार मिळण्याची शक्यता. पुढे किती दिवस त्याला सांबार खावे लागणार कोण जाणे. म्हणून तेव्हाच जेवण असे ठरले. अडीच वाजून गेले तरी रा म मा १७ दिसेना. जाड्या भुकेने कासावीस. अजून एक कोड ऑफ़ कॉन्डक्ट असा की गाडीत कहीहि खायचे नाही अन्यथा झुरळे मुंग्यादि कीटकांना आमंत्रण. ड्रायव्हर बदलतांना जाड्याकडील सर्व मारी बिस्किटांचा स्टॉक संपला. अर्थात आम्ही इतर चौघांनी देखील बिस्किटांचा अवमान केला नाही. त्याचे भुकेने कासावीस होणे पाहून आमची भरपूर करमणूक झाली व आम्हा इतर चौघांना भुकेची तीव्रता जाणवली नाही. परंतु रा म मा १७ आल्यावरच जेवायचे यावर तोहि ठाम होता. मासे मिळण्याचे आमिषहि त्याला होतेच. आम्ही देखील त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होतो. आम्ही ४ मुंबईकरांनी न्याहरी देखील केली नव्हती. शेवटी शेवटी हॉटेल दिसले की तो थांबायचा आग्रह करी. नंतर आग्रहाचे रूपांतर हट्टात झाले. त्यामुळे फक्त टिंगलीचे प्रमाण वाढले. हे दोघे गाडी अशा ठिकणी थांबवीत की आजूबाजूला हॉटेल नसे. सौ शेवडे ही देवाची सख्खी बहीण. नेमक्या अशा टिंगलीच्या क्षणी तिचा फोन आला. सुकाणू देवाकडे होते. मास्तरचे बोलून झाल्यावर त्याने जाड्याकडे फोन दिला. आम्ही सकाळी उठल्यापासून काहीहि खाल्लेले नाही व तुझा रथचक्रधारी क्रूरकर्मा भाऊराया आम्हाला काहीहि खाऊं देत नाही अशी त्याने तक्रार केली. तेव्हा तिनेहि मग तुमच्या मैत्रीत काही दम नाही बघ असे बोलून त्याची फिरकी घेतली. केवळ वजन वाढून त्याची प्रकृति बिघडूं नये हा एकमेव उदात्त हेतु त्यामागे आहे अशी आम्ही फोनवरून ऐकू जाईल असे ओरडून साक्ष देण्याचे परम कर्तव्य बजावले. त्यामुळे तिचीहि करमणूक झाली. अर्थात नंतर देवाच्या घरच्यांची देखील झाली असणार.

कमी वेगामुळे रा म मा १७ येईपर्यंत साडेतीन वाजून गेले. आमचा अगोदर अंदाज होता की संध्याकाळी पाचसहापर्यंत कणकवलीला पोहोचू. परंतु उजेड फारच कमी होता. संध्याकाळचे सात वाजल्यासारखे वाटावे एवढा अंधार तीनसाडेतीनलाच होता. त्यातच फारच जोरदार पाऊस. वळणे आहेतच. रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. तशात पावसाचा जोर वाढला. वायपर चालू होते. वेग आणखी कमी. सगळ्यांचे लक्ष रस्त्याकडे लागलेले होते. ड्रायव्हर किलींडर समोर, मी मागे मध्यभागी. जाड्या डावी व नार्‍या उजवी बाजू अशी वाटणी झाली. चारसाडेचारला हातखंबा आले. परंतु थोडे आंत जाऊन रत्नागिरीला मुक्काम करावा असे ठरवले. हायवेला हॉटेलाचे दर चढे असणार व सेवा देखील चांगली नसणार. रत्नागिरीलाच मुक्काम केला. हॉटेल पसंत करणे माझ्याकडे व घासाघीस करणे जाड्याकडे आले. घासाघीस करायला बायको नसल्यामुळे तो स्वत:च उत्तम घासाघीस करतो जे विवाहितांना करावे लागत नाही. मासळीबाजारात कोळणी त्याला गंडवतात तो भाग वेगळा. एका डबल ऑक्युपन्सीमध्ये मास्तर व देवा म्हणजे ब्राह्मण आणि दुसरीत आम्ही तिघे म्हणजे ब्राह्मणेतर अशी जातीय विभागणी झाली. नार्‍या वगळता आम्हा चौघांचा देवाधर्मावर विश्वास नसल्यामुळे आणि संकटप्रसंगीदेखील आम्ही अविचल रहिल्यामुळे आम्ही सर्व धर्मांची यथेच्छ टिंगल करतो. जातपात देखील मानत नसल्यामुळे आम्ही खाजगीत एकमेकांची जातीय टवाळी करतो. अर्थात इतरांच्या भावना दुखावू नये म्हणून खाजगीत. रात्री आठनऊ पर्यंत पाऊस पडत होता. दुसर्‍या दिवशी लवकर उठून जाण्याची खुमखुमी असल्यामुळे जेऊन लगेच झोपलो मास्तर व मी रोज साडेनऊलाच झोपतो. जेवल्यावर आम्ही दोघे झोपलो. नार्‍याने दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाला बिल व न्याहरी मिळेल याची व्यवस्था केली. देवाने गाडीची पाहाणी केली. जाड्या वजन आटोक्यात ठेवण्यासाथी जेवण्यापूर्वी भरपूर व्यायाम करतो व जेवणानंतर भरपूर चालतो. पाऊस नंतर थांबल्यामुळे त्याच्या चालण्यात व्यत्यय आला नाही.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav.com 11 Feb. 2008